Nagnath Kottapalle Death News:  ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं.  मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचं निधन झालं.


डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये झाला होता. त्यांची अत्यंत खडतर परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देगलूर महाविद्यालयातून पदवी घेतली. नंतर एम. ए. ला मराठवाडा विद्यापीठातून केलं. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती. 


पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात 19 वर्षे अध्यापनाचे काम केलं. नंतर ते 1996 ते 2006  या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. 2005 ते 2010 अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु देखील होते. 


कुलगुरू म्हणून मलेशिया येथील कुलगुरू परिषदेत सहभाग घेतला होता. ते महाराष्ट्रा शासनाच्या  भाषासल्लागार समितीचे अध्यक्ष देखील होते. 


कोत्तापल्ले यांची ग्रंथसंपदा :


कविता :


मूडस् 1976 ( राज्य पुरस्कार) मूडस् व नंतरच्या कविता २०१२
 
कथा :


कर्फ्यू आणि इतर कथा
संदर्भ
राजधानी 
रक्त आणि पाऊस 
कवीची गोष्ट
देवाचे डोळे 


कादंबरी :


मध्यरात्र 
गांधारीचे डोळे 
काळोखाचे पडघम


समीक्षा


त्रिज्या
ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध 
नवकथाकार शंकर पाटील 
साहित्याचा अन्वयार्थ
साहित्याचा अवकाश
मराठी कविता : एक दृष्टिक्षेप 


ललित गद्य :
उद्याच्या सुंदर दिवसांसाठी 


वैचारिक गद्य :
जोतिपर्व


अनुवाद कार्य :
'कोमेजलेला चंद्र' हा 'मालाजोन्हा' या उरिया कादंबरीचा मराठी अनुवाद एन. बी. टी. दिल्ली यांच्याकडून 1985मध्ये प्रकाशित.


प्रौढ साक्षरांसाठी :


'गावात फुललं चांदणं' ही लघु कादंबरी 


शालेय विद्यार्थ्यासाठी :
सत्यधर्मी जोतिबा फुले 


संपादने :


अपार्थिवाचे गाणे: संत ज्ञानेश्वरांच्या निवडक अभंगांचे सहकार्याने संपादन 


स्त्रीपुरुष तुलना 
पाचोळा आणि दहा समीक्षक
निवडक बी. रघुनाथ १९९५
शेतकऱ्यांचा आसूड २००१ ते २०१२ पर्यंत सात आवृत्त्या 
साहित्य व समाज- २००६ ३०.७ 'गद्यगौरव', 'गद्यवैभव' व 'कुमारभारती' अशा संपादनांमध्ये सहभाग


'राजधानी', 'मध्यरात्र', 'रक्त आणि पाऊस', 'उद्याच्या सुंदर दिवसांसाठी', 'अपार्थिवाचे गाणे', 'श्रीपुरुषतुलना', 'शेतकऱ्याचा आसूड' ही पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात वर निर्देशिलेल्या साहित्य संपदेवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांमधून अनेक अभ्यासकांनी एम.फिल., पीएच.डी. पदवी संपादन केली आहे