मनमाड : मुंबई-हावडा मेलचे (व्हाया नागपूर) तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. मनमाड-इगतपुरीजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांवर मोठा परिणाम झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, घसरलेले डबे बाजूला काढण्यात यश आले आहे.

या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द, तर काही गाड्या वेगवेळ्या रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या. तसेच मुंबई-पटना एलटीटीपाटली पुत्र एक्स्प्रेस व मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

एएनआयच्या माहितीनुसार, या मार्गावरील एकूण 12 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.


रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करुन  मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे.

गाडीतील प्रवाशांसाठी मनमाड येथे चहा, नाष्ट्याची सोय रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे, सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.