नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध आहे. मात्र हा विरोध असतानाही ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.


‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.

प्रकल्पातील भागीदारी कशी असेल?

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 50:25:25  प्रमाणे भागीदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापना केली.  आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती आणि विकासासाठी भारतीय तेल कंपन्या आणि सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये 50:50 प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.

धर्मेंद्र प्रधान उद्धव ठाकरेंना भेटणार

नाणार प्रकल्पाला कोकणातून मोठा विरोध आहे. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही पाठिंबा आहे. मात्र याबाबत आपण स्वतः उद्धव ठाकरेंशी बोलू आणि ग्रामस्थांच्या जमीन अधिग्रहणाच्या समस्या आहेत, त्यावर बोलू, असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

हा प्रकल्प उभा करताना ग्रामस्थांच्या मताचा पूर्णपणे आदर केला जाईल आणि सर्वांसोबत चर्चा केली जाईल, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य

जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प

जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना

वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता

पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे?

इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.

संबंधित बातम्या :

नाणार प्रकल्पासाठी सरकार एक पाऊल पुढे, आणखी एका कंपनीशी करार


कोकणात ‘नाणार’ काही होत नाही, आम्ही तो घालवलाय : उद्धव ठाकरे


ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?