मुंबई : राज्यातल्या सहा जिल्ह्यांत 1 लाखांपेक्षा अधिक लोक लठ्ठपणानं त्रस्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामुळं ही माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, लठ्ठपणाचा आजार शहरी भागासोबत ग्रामीण भागातही फोफावतो आहे.


राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाच्या 1 ते 26 मे राज्याच्या विविध भागात पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र शिबीर भरवलं होतं. यामध्ये पालघर, बीड, नाशिक, चंद्रपूर, अकोला आणि नाशिक या जिल्ह्यातील नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

या शिबीरात 9 लाख 52 हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाखापेक्षा अधिक जण लठ्ठ असल्याचं आढळलं. विशेष म्हणजे, हा लठ्ठपणा शहराबरोबर ग्रामीण भागातही फोफावत असल्याचं दिसून आलं.

या शिबीरानंतर राज्य सरकारने विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची आकडेवारी नुकताच जाहीर केली. यात राज्यातील 1 लाख 48 हजार नागरीकांना हाडांच्या आजाराच्या समस्या आहेत. यातील 1 लाख 4 हजार नागरीकांना शस्त्रक्रियेची गरज आहे. राज्यातील 78 हजार नागरीक डोळ्यांसदर्भातील आजारांनी त्रस्त आहेत. तर एक लाखापेक्षा अधिक नागरिक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत.

या शिबीरामध्ये ज्यांची तपासणी केलेल्या नागरिकांना वैद्यकीय सल्ल्यानुसार, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.