अमरावती: डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातील 4 नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक चौकशी अहवाल समोर आला आहे.


निर्जंतुकीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं आहे.

अतिदक्षता विभागात दर आठ दिवसांनी निर्जंतुकीकरण करणं बंधनकारक आहे. त्याबाबत मायक्रो बायोलॉजी विभागानेही तब्बल 13 वेळा सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

निर्जंतुकीकरण न केल्यामुळे आयसीयू विभागात जंतूची लागण झाली होती. त्यामुळे एका बालकाचा मृत्यू झाला होता. त्याची लागण 3 नवजात बालकांना झाली, असा अहवाल 5 डॉक्टरांच्या चौकशी समितीने दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 28 मे रोजी घडली.

एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच बालकं दगावल्याने, नातेवाईक आक्रोष व्यक्त करत आहेत.

डॉक्टरला अटक

डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयातील चार नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालयाचे डीन डॉ. दिलीप जाणे, डॉ. पंकज बारब्धे आणि डॉ. प्रतिभा काळे यांना पोलीस सहआरोपी करणार आहेत.

मनसेकडून डॉ. भूषण कट्टांना मारहाण

4 नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि बालकांच्या नातेवाईकांकडून डॉ. भूषण कट्टा यांना मारहाण करण्यात आली.

डॉ. भूषण कट्टा हे बालकांच्या मृत्यू वेळी तिथेच ड्युटीवर होते आणि मुलांच्या मृत्यूला त्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे, असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला होता. मनसे कार्यकर्ते आणि मृतांचे नातेवाईक मुलांच्या मृत्यूचे कारण विचारण्यास थेट डीन दिलीप जाणे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी डॉक्टर भूषण कट्टा हे देखील तिथं उपस्थित होते. त्याचवेळी ही मारहाण करण्यात आली.

संबंधित बातम्या:

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू

चार बालकांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

अमरावतीतील 4 बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक