अहमदनगर : रोजगार निर्मितीसाठी लाखोंची गुंतवणूक आणल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी, खरं वास्तव हे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळत आहे. अहमदनगरला सध्या 210 पोलीस शिपाई पदासाठी भरती सुरु आहे. मात्र तब्बल 31 हजार 703 अर्ज दाखल झालेत.


विशेष म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी उच्च शिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बी फार्म, बीटेक, बीएड, बीसीएस, बीएसस्सी, बीएसस्सी अॅग्री- टेक्नॉलॉजी, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमएसस्सी, एमएसस्सी अॅग्री आणि अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या तरुणांनी भरतीला हजेरी लावली आहे. यामध्ये बीएड झालेल्या उमेदवारांची संख्या साडे चार हजारांपेक्षा जास्त आहे.

पोलीस भरतीला आलेल्या तरुणांची व्यथा

बेरोजगारीमुळे पोलीस भरतीला यावं लागत असल्याचं तरुण सांगतात. संदीप नागरे हा तरुणा 65 टक्के घेऊन कम्प्यूटर इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाला. मात्र खासगी क्षेत्रात नोकरीची संधी कमी आहे. नोकरी मिळाली तर पगार कमी. वय वाढत चाललंय, या हतबलतेतून अखेर पोलीस शिपाई होण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागला.

शिक्षित तरुणांना रोजगार मिळाला नाही तर वेगळ्या मार्गाने तरुण जाण्याची भिती संदीप नागरेने व्यक्त केली. वडील प्राचार्य असून आमच्यावर ही वेळ आली आहे, तर शेतकऱ्यांच्या मुलांची काय अवस्था असेल, असंही संदीप म्हणतो.

हनुमंत मारकड या तरुणाचीही अवस्था संदीपपेक्षा वेगळी नाही. हनुमंतने एमसीए केलं आहे. मात्र खासगी क्षेत्रात असुरक्षितता असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न असल्याचं तो सांगतो.

दरम्यान, भरतीसाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन करुन हायटेक भरती प्रक्रिया राबवली आहे. भरतीत गैरप्रकार टाळून पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा राबवली आहे. बायोमेट्रिक हजेरी, धावताना वेग आणि वेळेसाठी चिपचा वापर करण्यात येतोय. त्याचबरोबर मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनचाही वापर केला आहे.

वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. बाहेर गावावरुन आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस गाडी तैनात करण्यात आली असून पोलीस मुख्यालयात राहण्याची व्यवस्था आहे. तर जखमी आणि गैरहजर उमेदवारांना 5 एप्रिलला संधी देण्यात येईल. महिला उमेदवारांसाठी 3 एप्रिलला भरती ठेवण्यात आली आहे.

अहमदनगरच्या पोलीस भरतीतील उच्चशिक्षित तरुण

बी. फार्म - 3

बी. टेक - 8

बीएड - 4,649

बीएए - 8

बीबीए - 27

बीसीए - 154

बीकॉम - 845

बीसीएस - 308

बीएस्सी - 903

बीएस्सी अॅग्री - 38

बीएस्सी टेक्नोलॉजी - 9

इंजीनियरिंग - 66

इंटेरियर डिझायनर - 3

एलएलबी - 2

एमए-468

एमबीए - 22

एमसीए - 8

एमसीएम - 1

एमकॉम - 100

एमसीएस - 7

एमएड - 8

एमएसस्सी - 55

एमएसस्सी अॅग्री - 1

एमएसस्सी टेक्नोलॉजी - 1

एमएसडब्ल्यू - 14

बारावी पास - 21,693

ही फक्त अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती आहे. राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी असंच चित्र पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाने पालघरच्या पोलीस भरतीतील हेच वास्तव समोर आणलं होतं.