मुंबई : शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा हालचालींना सुरुवात झाली आहे. युतीसाठी चर्चेची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दिली गेल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.


तेलगू देसम पार्टीनं एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपनं राज्यात सावध पवित्रा घेतला आहे. तर कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानच्या निकालापर्यंत शिवसेना 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याची माहिती मिळतेय.

खरं तर शिवसेनेनं यापूर्वीच स्वबळावर निडवणूक लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता भाजपनं मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे युती होते की, पुन्हा शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘भाजप नेहमीच युतीसाठी सकारात्मक’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. ‘केंद्रातली एनडीएची आघाडी राज्यात टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षाला सोडून निवडणुका लढवण्याची आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही. युतीसाठी चर्चेला कोण जाणार हे कोअर कमिटीच्या बैठकीत ठरेल.’ असं ते यावेळी म्हणाले.

‘दोन जागा गेल्या म्हणून संपूर्ण उत्तरप्रदेश हरलो असं समजू नका’

‘2014 नंतर 70 टक्के निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. दोन जागा गेल्या म्हणून संपूर्ण उत्तरप्रदेश हरलो असं समजण्याचं कारण नाही. 2019 मध्ये मित्र पक्षासोबत बहुमताने जिंकू असा विश्वास आहे.’ असं दानवे म्हणाले.

‘मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानांही ‘सामना’ सरकारवर टीका करायचं’

‘मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सुद्धा ‘सामना’ सरकारवर टीका करत होतं. त्यामुळे वर्तमान पत्राच्या लिखाणावर राजकीय पक्षाचे संबंध बिघडत नाही, निवडणुकीला अद्याप दीड-दोन वर्षे बाकी आहे.’ असं म्हणत दानवेंनी शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या :

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार : मुनगंटीवार

शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं एक पाऊल पुढे?