मुंबई : राज्यात मान्सूनचं आगमन काही दिवसात होणार असलं तरी पाऊस जोर धरण्यासाठी जुलै उजाडणार आहे. कारण पावसाला जोर धरण्यासाठी हवामान अनुकूल नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


वायू वादळामुळं अरबी समुद्रावरचं हवेतलं बाष्प उडून गेलं आहे. तर मान्सून जोर धरण्यासाठी आवश्यक ती उंची देखील नैऋत्य मोसमी वाऱ्यानं गाठलेली दिसत नाही. त्यामुळं मान्सून थेट जुलैमध्ये जोर धरणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे एकीकडे धरणानं तळ गाठला असताना दमदार पावसाला विलंब होणार असल्यानं शेतकऱ्यांसह उभ्या महाराष्ट्राची चिंता वाढणार आहे.

भारतीय हवामान विभागानं पुढच्या 10 दिवसांचा अंदाज वर्तवताना महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. पण सध्याची हवामानाची निरीक्षणं पाहिली तर ती पावसासाठी अनुकुल नसल्याचं दिसतं आहे.

सध्याची हवामानाची स्थिती आणि आयएमडीसह अनेक मॉडेलचे महिनाभराचे अंदाज पाहिले तर पुढच्या 20 दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा नाही.

वायू चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर जमा झालेलं बहुतांश बाष्प निघून गेला आहे. मॉन्सूनचे नैऋत्य मोसमी वारे समुद्र सपाटीपासून साधारणपणे सहा किलोमीटर पर्यंतच्या उंचीवर प्रवाहीत असतात.

सध्या त्यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त दीड किलोमीटरपर्यंतच असल्याचं दिसतं आहे.  नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर वातावरणात सहा किलोमीटर उंचीवर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाहू लागतो. सध्या हा प्रवाह दहा किलोमीटर उंचीवर आहे. थोडक्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक आदर्श स्थिती तयार झालेली नाही.  समजा काही दिवसांमध्ये हे प्रवाह सुरळीत झाले, तरी पुरेशा बाष्पाअभावी येत्या काही दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आयएमडीच्या आठवड्याभराच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात ओडिशा जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. पुढे ते मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे 24 ते 28 जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आयआयटीएमच्या चार आठवड्यांच्या पावसाच्या अंदाजानुसार 27 जून ते 3  जुलैच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतरचा आठवडा कोरडा राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातल्या धरणांमध्ये आजमितीला केवळ 6.35 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा पाणीसाठा 17 टक्के होता. मराठवाड्याची स्थिती सर्वात भीषण आहे. कारण इथं केवळ 0.79 टक्के पाणी धरणांमध्ये आहे. अल निनोच्या प्रभावाचं हे सलग दुसरं वर्ष आहे. त्यामुळे परिस्थिती भीषण असणार आहे.