Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे बहुमताच्या बाजूने आले तर किंवा दहा वीस वर्षांनी त्यांना बहुमत मिळाले तर ते मुख्यमंत्री (chief minister) होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी केलं. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2024 ला नाही तर आताही आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. 


दावा करणं आणि बहुमत असणं वेगळी गोष्ट 


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळं दावा करणं आणि बहुमत असणं वेगळी गोष्ट असल्याचे दानवे म्हणाले. अजित पवार बहुमताच्या बाजूने आले किंवा दहा-वीस वर्षांनी त्यांना कदाचित बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाजही दानवेंनी यावेळी व्यक्त केला.


अजित पवारांच्या आरोपांचे दानवेंनी केलं खंडन


दरम्यान, शिवसेनेतून फूटून आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा सरकारी यंत्रणांनी मदत केली असा आरोप अजित पवारांनी केला होता. या आरोपांचे दानवेंनी खंडन केलं. जर आमदार संरक्षण मागत असतील तर राज्यघटनेप्रमाणं त्यांना संरक्षण देण्याचं काम सरकारी यंत्रणा करते. सरकार बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत सरकारनं केली नसल्याचा खुलासा दानवेंनी केला.


नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. याचा केंद्रबिंदू राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आहेत. 2024 ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची 'दिलखुलास दादा' ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत अजित पवारांनी (Ajit pawar) हे सूचक वक्तव्य केलं आहे. अजित पवारांनी  हे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. मागील काही दिवसांपासून अजित पवार महाराष्ट्रात राजकीय भूकंप करणार आणि ते भाजपात जाणार,अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांची मुलाखत झाली. यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पदाचं अजिबात आकर्षण नाही आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल एवढं संख्याबळ राष्ट्रवादीकडे होतं. काही वेळा अनेक निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. हे सगळे निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी  हे निर्णय मान्य करावे लागतात. 2004 मध्ये काँग्रेसबरोबर आमची आघाडी होती. राष्ट्रवादीच्या 71 जागा निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसच्या 69 जागा आल्या होत्या. मात्र त्यावेळी कॉंग्रेसला वाटत होतं की यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. मात्र त्यावेळी दिल्लीतून उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार असं सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यावेळी जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं असतं तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असं ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : 2024 ला नाही, मी आताच 'मुख्यमंत्री' होणार; अजित पवार यांचं सूचक वक्तव्य