उस्मानाबाद (मराठवाडा): एबीपी माझानं भारतीय टेलीव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाचं दुष्काळ आकाशातून चित्रीत केला  आहे. यासाठी की महाराष्ट्र सावध रहावा. पावसाळा सुरु झाला की लगेच दुष्काळाचं सावट हटेल, सगळं अलबेल होईल, अशा भ्रमात कोणी असू नये. या वर्षीच्या दुष्काळानं मराठवाड्याच्या भूमीला असे तडे गेलेत की पाऊस वेळेवर सुरु झाला तरी स्थिती सुधारायला दोन महिने लागतील.


 

 

बर्ड आई व्हियू मधून दिसणारा दुष्काळ सांगतोय.. पुढचा काळही आव्हानाचा आहे. आव्हानाचं स्वरुप वेगळं असेल. गाफिल रहाल तर परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चिघळेल.

 

 



 

५ हजार फुट उंचीवरून दिसणारं. मांजरा नदीवरचं बीड-उस्मानाबाद सीमेवरचं मांजरा धरण. २५० दशलक्ष घनमिटर पाणीसाठ्याचं. ज्या धरणाचं पाणी ४३ वर्ग किलोमिटर पर्यंत पसरतं. मांजरा १९८० नंतर पहिल्यांदाचं पूर्ण आटलं आहे. पाणी नसल्यानं धरणात मेलेले मासे, कासवं, शिंपल्यांचा खच पडला आहे. या हिरव्या पाण्याची वरपर्यंत दुर्गंधी येते.

 

 

बीड शहराला पाणीपुरवठा करणारा शहराजवळचा बिंदूसारा तलाव ९ एमएमक्युब क्षमतेचा बिंदुसारा फेब्रुवारी २०१५ पासून कोरडा आहे.

 

 



 

५९८ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा क्षमतेचं तेरणा नदीवरचं माकणी धरण. धरणात फक्त ५ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. दोन आठवड्यात हेही पाणी संपेल. मराठवाड्यातल्या ११ पैकी ८  मोठ्या धरणात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. ८१४ लघु, ८५ मध्यम धरणं आणि ७२८ तलाव पुर्ण कोरडे पडले आहेत. ३ धरणात दीड टक्का पाणीसाठा आहे. चर्या खोदल्या तरी तलावात पाणी लागत नाही.

 

 

पाच हजार फुट उंचीवरून स्पष्ट दिसतं. मराठवाड्याच्या जमिनीचं वाळवंट होत चाललं आहे. आकाशातून ४०-४० वर्ग किलोमिटरपर्यंत नजर जाते. एवढ्या उंचीवरूनही ६४ लाख हेक्टर क्षेत्रफळातला हिरवा भाग शोधावा लागतो. पेरणी योग्य ५४ लाख हेक्टरवर गवताची पाती शिल्लक नाही.

 

 



 

गोदावरी, मांजरा, तेरणा, पुर्णा, दुधना, लेंडी, कोणत्याच नदीपात्रात पाणी नाही. पाटोद्या जवळचं सौताड्याचं मांजरा नदीचं उगम स्थान. नदी कसली पांढरी रेघ दिसते.

 

 

परभणीजवळं गोदावरीत चार्या खोदून पाणी मिळवण्याचा गावकरी प्रयत्न करत आहेत. गोदावरीत पाण्याऐवजी धुरळा उडतो. नदी पात्रातल्या पाणी पुरवठ्याच्या ६ हजार विहीरी कोरड्या पडल्या आहेत. दोन-दोन किलोमिटर पर्यंतची पायपीट करून ग्रामस्थ पाण्याचा शोध घेत आहेत.

 

 



 

लातूर शहरात चार वाहनांमागं एक पाण्याचा टँकर धावताना दिसतो. १२ हजार टँकर ५ लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दिवसरात्र पाण्याच्या साठ्यावर गर्दी करतात. इथल्या पाण्याच्या टाक्या. निर्जीव वास्तू झाल्या आहेत. मराठवाड्यातल्या १२ मोठ्या शहरात दहा दिवसातून एक वेळेस पाणी येतं. शहर आणि ८ हजार ५२२ गावांतल्या ५६ लाख लोकांना पाणी पाजण्यासाठी साडेतीन हजार टँकर पळताना दिसतात. निजामानं बांधलेली ऐतिहासिक खजाना बावडी शतकात दुसऱ्यांदाच आटली.

 

 

बालाघाटच्या डोंगररांगा सुकल्या आहेत. डोंगरातली झाडी वाळून गेली आहे. जनावरे चाऱ्यासाठी रानोमाळ भटकताहेत. जंगलातले प्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. मोर, हरणांच्या झुंडी पाण्याच्या शोधात आहेत. सामाजिक वनीकरणान लावलेली. वनं करपून गेली आहेत. हजारो झाडं मुळापासून जळून गेली आहेत. तीन वर्षापूर्वी फळांनी बहारलेल्या शेकडो फळबागा करपल्या. यातली किती फळझाडं पुन्हा जिवंत होतील आज सांगता येत नाही.

 

 



 

शेड नेटच्या कापडाच्या सावलीत. मराठवाड्यात छावणी नावाच्या ३७३ नव्या वसाहती वसल्या आहेतं. पावणे चार लाख जनावरं. जनावरांना सांभाळणारी माणसं वस्तीला आहेत. पावसाळा वेळेवर सुरु झाला. तर या वसाहती लगेच उठून जातील पण या भेगाळलेल्या जमिनीत पाणी पाझरून नदी-नाले-कुपनलिका वाहत्या व्ह्यायला पावसाळ्याचे दोन महिने लागतील. या मरुभूमीत नवे कोंब फुटायला जुलै उजाडेल. तोपर्यंत टँकर सुरुच ठेवावे लागतील. प्रश्न आहे तो या दुष्काळानं पर्यावरण आणि माणसांच्या किती पिढ्यांचं नुकसान केलं आहे याचा...