मुंबई : 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केला जात आहे. हा प्रश्न सध्या केंद्र सरकारच्या अख्यत्यारित असून लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळेल असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं आहे. 


अभिजात भाषेसंबंधी निकष काय असावेत यासंबंधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) निर्णय घेतं. आतापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये (Eighth Schedule of the Constitution) करण्यात आली आहे. 


अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात, 


1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. 
2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे. 
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.


Classical Language Status: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?


1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.


सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. 


List of India Classical Language: देशातल्या अभिजात भाषांचा  प्रवास 


सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. पहिली भाषा 2004 मध्ये तामिळ आणि त्यानंतर 2014 मध्ये उडिया भाषेला मिळाला आहे. 
मराठीला जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ही संख्या सात इतकी होईल. 


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा: