Maharashtra Politics : मराठा समजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलं आहे. त्यानंतर, आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून आता जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून 7 ऑगस्टपासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून (Solapur) सुरुवात होणार आहे.


राज्याचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे हे आता येत्या 29 ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की तिसऱ्या आघाडीत जायचं, की आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत घोषणा करु, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही टेन्शनमध्ये आले आहेत. मुळात जरांगे यांच्या निर्णयामुळे कुणाला काय फायदा आणि कुणाला तोटा होऊ शकतो, याचा आढावा जाणून घेऊया या बातमी मधून. 


मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष 


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आगामी काळातील आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ, असं म्हंटलं आहे. यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. मनोज जरांगे यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय असेल, याबाबत मात्र सुतोवाच या आधीच केले आहेत.


मनोज जरांगे यांनी आधीच सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबतच दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी ओवेसी, बच्चु कडू, प्रकाश आंबेडकर यांना आधीच आवाहन देखील केलं आहे. एकंदरीतच आगामी काळात महायुतीला फायदा होईल, अशा प्रकारचे राजकारण तर मनोज जरांगे यांचे सुरु नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


मनोज जरांगे यांचा कुणाला फटका कुणाला फायदा


मागील लोकसभेचा विचार केला तर वंचित आणि एमआयएमची युती झाल्याचं पहायला मिळालं होतं. याचा थेट फायदा हा तत्कालीन भाजप शिवसेनेच्या सरकारला झाला होता. कारण राष्ट्रवादी- काँग्रेस युतीला मिळालेली मतं यानिमित्ताने विभागली गेल्याची आणि परिणामी भाजप शिवसेनेला फायदा झाल्याची बाब निदर्शनास आली होती. आता देखील हाच कित्ता परत गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बच्चु कडू यांनी शेतकरी आघाडी काढण्याबाबत घेतलेला निर्णय, प्रकाश आबंडेकर मनोज जरांगे यांना या आघाडीत येण्यासाठी दिलेल निमंत्रण, हे गणित पाहता आगामी काळात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचीच डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण या तिन्ही पक्षांचा मतदार हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार आहे. जर जरांगे यांनी लोकसभेला जागा उभ्या केल्या असत्या तर कदाचित वेगळं चित्र सध्या पाहायला मिळाले असतं. कारण एकट्या जरांगे यांच्या करिष्म्यामुळे मराठवाड्यातील महत्त्वाच्या जागा महायुतीच्या हातून गेल्याचं पाहिला मिळाले होतं.


तिसरी आघाडी झालीच तर महायुती ऐवजी मविआला फटका?


लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मराठवाड्यात प्रभाव पडलेल्या 5 लोकसभा मतदारसंघात एकूण 30 विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या तरी महायुतीचं प्राबल्य पाहिला मिळत आहे. अद्याप जरांगे यांनी विधानसभेची रणनिती जाहीर केलेली नाही. त्यांच्या एकूण 288 जागा लढणार की काहीच जागा लढणार यावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संख्याबळाचं गणित अवलंबून असणार आहे. शिवाय तिसरी आघाडी झालीच तर महायुती ऐवजी महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची दाट शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या