Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु केलेल्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) लढ्याला अखेर आज यश आले असून, मराठा आरक्षणाच्या बाबत सरकराने अध्यादेश काढला आहे. दरम्यान, या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात असून, मनोज जरांगे यांनी विजयानंतर पहिली मुलाखत 'एबीपी माझा'ला दिली आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबाची आठवण करून देताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरल्यावर समाज हाच माझ्यासाठी कुटुंब असल्याचे म्हणत जरांगे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 


एवढ्या दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहिलो आहेत, त्यामुळे या लढ्यात त्या कुटुंबाचा देखील तेवढाच वाटा आहेत का? असा प्रश्न विचारताच जरांगे भावूक झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, 'या लढाईत कुटुंबाचा देखील वाटा आहे. मात्र, घर सोडतांना मी त्यांना कधीच कुटुंब मानले नाही, कारण मी समाजाला कुटुंब मानले होते. शेवटी संसार करतांना माया प्रत्येकाला असते. मुलं हे मुलं असतात आणि बाप हा बापच असतो. त्यामुळे कुटुंबाला मी कधीच आंदोलनात येऊ दिले नाही. कारण आपल्या ध्येयापासून आपण विचलित होऊ शकतो. मात्र, जेव्हा समाज भेटण्यासाठी रुग्णालयात यायचा तेव्हा कुटुंबातील सदस्य देखील समाज म्हणूनच भेटण्यासाठी यायचे. समाजाने खूप त्याग केला आहे. समाजातील अनेकांचे बलिदान गेले, त्याचे कुटुंब उघड्यावर पडले. बलिदानाचा विषय निघाल्यावर मला खूप वाईट वाटते, असे म्हणत जरांगेंना अक्षरशः रडू कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. 


माउलींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले 


मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष दौरा करणार आहे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. तमाम माउलींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे. आज अनेक लेकरं आपल्यात नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरातील आई-वडीलांवर आणि कुटुंबावर काय बेतते हे शब्दात सांगता येणार नाही. बोलणं खूप सोपं असते, असे म्हणता जरांगे यांच्या डोळ्यात पाणी आले. 


सर्वसामान्य मराठे पाठीशे उभं राहिले 


मला माहित होते की आपल्याला पैसे वाल्यांची गरज नाही. आपण जिद्दी असून, एखाद्या ध्येयावर उतरल्यास मागे हटत नाही असा माझा स्वभाव आहे. आपण जर एकजूट झालो तर काहीही होऊ शकते. श्रीमंताची गरज असावी असे काही नाही. ज्यावेळी सर्वसामान्य मराठे पाठीशे उभं राहिले आणि त्यांनी ठरवले की या लेकराला साथ द्यायची. आज त्यांच्या साथीचे मी चीज केलं आहे. मी त्यांच्या साथीचा माझ्यासाठी वापर केला नाही, त्यांच्या ताकदीचा वापर त्यांच्यासाठीच केला. त्यामुळे आज माझ्या समाजाला न्याय मिळाला असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


Eknath Khadse : "जीआर म्हणजे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक"; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल