जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा जेथून सुरु झाला त्या आंतरवालीत रात्री उशिरा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, आंतरवालीत पोहचताच मनोज जरांगे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला. 'वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका' असा सल्लाही मनोज जरांगे यांनी गावकऱ्यांना दिला. 


दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,“यांचं ऐकायची गरज नाही. घटना तज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. उल्हास बापट आणि उज्वल निकम यांची प्रतिक्रिया बघा. बाकीचे हे वाया गेलेली लोक आहेत, यांचे मनावर घ्यायची गरज नाही. कायदा पारित झाला झाला हा मराठ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आता करायचं असल्यास कोणीही चॅलेंज करू शकतो आणि न्यायालयमध्ये जाऊ शकतो. सगळ्या अध्यादेशाच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर झालं म्हणजे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला," असे जरांगे म्हणाले. 


आंतरवालीतील लढाई एवढ्या लांब जाईल असे वाटलं नव्हतं...


दरम्यान उपस्थित गावकऱ्यांना संबोधित करीत असतानाच जरांगे म्हणाले की,“ विश्वास बसत नाही एवढं मोठं कायदा पारित झाला. कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. घटनातज्ञानी जे मत मांडलाय त्यानुसार हे समुजन घेणे गरजेचे आहे. हा कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे. नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळालं आहे. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांनाच आरक्षण, असे कसं हा मोठा चॅलेंज माझ्यासमोर होता. कारण मी शब्द देऊन बसलो होतो. या शब्दात मराठ्यांचा किती हित आहे हे मी आधीच हेरल होतं. आंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं नव्हतं.  मी म्हणालो मुंबईच्या गल्ली गल्लीत जमा व्हा आणि खरंच मराठे गल्ली गल्लीत जमले. अहमदनगरच्या पुढे रोडच दिसला नाही. एवढ्या प्रचंड संख्येने लोकं होती. पुण्यात 64 किलोमीटर लाईन होती, असे जरांगे म्हणाले. 


सगळ्या बाजूने मराठा आत गेला पाहिजे


लढा जिंकला, 57 लाख लोकांना आरक्षण मिळालं. त्यानुसार आडीच लाख लोकांना फायदा मिळाला व आता कायदा पारित झाला. त्यामुळे उर्वरित मराठ्यांना देखील लाभ मिळणार आहे. आताही आमचं बोलणं झालं, फेब्रुवारीत अधिवेशन आहे. त्यावेळी कायदा पारित होणार आहे. आणखीन एक गोष्ट बांधून घेतली असून, मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असल्याने शिंदे समितीची मुदत वाढ करण्याचं सांगितले आहे. या कायद्या विषयी कितीही गौरसमज झाले, तरी कुणीही चॅलेंज करू शकत नाही. मी सर्व अभ्यासक, तज्ञ, वकील बोलावले होते. सर्वांनी शब्दाचा किस पाडला व याला काहीच होऊ शकत नाही असे म्हंटले. समाजासाठी हा कायदा खूप मोठा झाला आहे. या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य थांबू शकत नाही. मराठवाड्यातील मराठ्यांच्या अडीअडचणी देखील संपणारा आहेत. सगळ्या बाजूने मराठा आत गेला पाहिजे. काल सात शासन निर्णय झालेत असेही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कुटुंबाची आठवण काढताच, आक्रमक जरांगेंच्या डोळ्यात घळाघळा पाणी; विजयानंतर पहिली मुलाखत