एक्स्प्लोर

महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांना 'माझा सन्मान' !

मुंबई : असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांचा आज 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गीतकार गुलजार यांच्या हस्ते 10 रत्नांचा गौरव करण्यात आला.   सन्मानमूर्तींमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाची आशा असलेली धावपटू ललिता बाबर, निराधारांचा आधार मार्क डिसूझा, संशोधक डॉ. शुभा टोळे, साहित्यिका डॉ.अरुणा ढेरे, सैराटफेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, उद्योजक हणमंत गायकवाड, शास्त्रीय गायक महेश काळे, नाम फाऊंडेशन आणि पाणी फाऊंडेशन यांचा समावेश आहे.   सन्मानमूर्तींची ओळख   डॉ. सुधीर पटवर्धन-चित्रकार पेशाने डॉक्टर.. पण तरीही रेषेच्या विविधतेत सतत रमणारी अशी ही व्यक्ती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन.. चित्रांची वेगळी आणि सोपी, पण काहीतरी सांगणारी अशी शैली.. जी आज ही समीक्षकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना भावणारी आहे.. चित्रकार सुधीर पटवर्धन लोकांच्या खासगी आणि सामाजिक जीवनाचा चित्रातून एकाच वेळी वेध घेतात. त्यांच्या चित्रांत मानव कधी संघटित तर कधी विघटित स्थितींमध्ये आढळतो. पटवर्धनांच्या कॅनव्हासवर औद्योगिकीकरणाच्या रेट्यात मागे हटत गेलेला निसर्ग दिसतो.. चित्रांतील व्यक्ति या कष्टकरी, कारखान्यांतले कामगार, बांधकामावरचे मजूर, साधे प्रवासी अशा प्रकारची असतात. 05 अभिजात ग्रंथ वाचणारे, चर्चा करणारे, काही चित्रकार असतात. त्याच गटातले चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन. वाचनाची आवड असल्याने तरूणपणी कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर झाला. त्याच प्रमाणे कामू, सार्त्र आणि सिमॉन द बोवा हे लेखक मी वाचले असे ते सांगतात. त्या वाचनाचा, त्या विचारांचा माझ्या कलेवर परिणाम झाला असे ही ते म्हणतात. प्रख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्राला दाद देणारे दर्दी हे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. अनेक जाणकारांच्या संग्रही पटवर्धवन यांच्या चित्रांचं संग्रह असणं हे कलेच्या वर्तुळात अत्यंत मानाचं समजलं जातं. अनेकांना चित्रशिल्प बघायला आवडते पण त्यासाठी चांगल्या संधी मिळत नाही. ही उणीव लक्षात घेऊन त्यांनी एक उपक्रम राबवला.. ‘विस्तारणारी क्षितिजे या आधुनिक आणि समकालीन भारतीय केलेचे फिरते प्रदर्शनाचं आयोजन आठ वेगवेगळ्या शहरात त्यांनी केल होतं. अशा या जगविख्यात प्रतिभावंत चित्रकाराला एबीपी माझाचा मानाचा मुजरा   ललिता बाबर कोरड्याठाक नद्या, सुकलेले बंधारे आणि ओसाड पडलेल्या जमिनी...  साताऱ्याच्या माणदेशात वर्षानुवर्षे हेच चित्र आहे. त्या दुष्काळी परिस्थितीशी कठोर संघर्ष करून उदयास आलेली ललिता बाबर आज रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकाची आशा बनली आहे. ललिता एक मॅरेथॉन रनर म्हणून गेली पाच वर्षे देशभरातल्या रोड रेसेस गाजवत आहे. मुंबई मॅरेथॉनमधल्या भारतीय महिलांच्या गटात, ती गेली दोन वर्षे रौप्यपदकाची मानकरी ठरली.   त्याआधी सलग तीन वर्षे ललिता विजेती ठरली होती. याच कालावधीत परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांनी तिच्यातली 3000 मीटर्स स्टीपलचेससाठीची गुणवत्ता ओळखली आणि गेल्या दोन वर्षांमध्ये ललिता ट्रॅकवरही पळायला लागली. 2014 सालच्या एशियाडमध्ये ती स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाची मानकरी ठरली. मग 2015 साली आशियाई अॅथलेटिक्समध्ये ललितानं स्टीपलचेसचं सुवर्णपदक जिंकलं. बीजिंगमधल्या जागतिक अॅथलेटिक्समध्ये तिनं स्टीपलचेसची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवला. तीच ललिता बाबर आता रिओ ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी सज्ज झालीय. ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी तिला एबीपी माझाच्याही हार्दिक शुभेच्छा.   मार्क डिसूझा.. मुंबईच्या बोरीवली आणि त्याच्या आजूबाजूतील भागातलं अगदी ओळखीचं नाव. व्यवसायाने ते इस्टेट एजंट. पण जनमानसात प्रसिद्ध आहेत त्यांच्या समाजसेवेमुळे.. ज्यांना मूल-बाळ नाही, ज्यांना सांभाळायला कोणी नाही, ज्यांना स्वतःसाठी चार घास शिजवताही येत नाहीत, अशा वृद्धांसाठी त्यांनी १४ नोव्हेंबर २०१२ साली मोफत डबा पोहोचवायला सुरुवात केली आणि एक दिवसाचाही खंड न पडू देता त्यांचं हे काम अव्हातपणे आजतागायत सुरु आहे. रोज पाच डब्यांपासून त्यांनी हे कार्य सुरु केलं आणि डब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. या बदल्यात त्यांना अपेक्षा आहे फक्त आशीर्वादाची. मार्क डिसूझा यांच्या मूक समाजकार्याला माझाचा सलाम 06 डॉ. शुभा टोळे भारतात संशोधन फारसं होत नाही अशी नेहमीची ओरड असते, त्यामुळे मुळात संशोधकच कमी आणि त्यातही महिला संशोधकांची संख्या तर आणखीच कमी. असं असतानाही पूर्णपणे संशोधनाला वाहून घेतलेल्या आणि मानवी जिवनाला उपकारक असा अभ्यास करणाऱ्या महिला संशोधक म्हणजे डॉ.शुभा टोळे. मोठ्या परिश्रमाने मेंदूतील विशिष्ट भागाच्या वाढीसाठी आवश्यक प्रक्रियेचा शोध डॉ. शुभा टोळे यांनी लावलाय. 09 या त्यांच्या शोधामुळे ऑटिझमसारखे आजार होण्यामागची कारणं समजू शकतात. २००७ साली त्यांनी केलेल्या या संशोधनासाठीच त्यांना मानाचा भटनागर पुरस्कार प्राप्त झालाय. त्याचबरोबर या संशोधनासाठी त्यांना इन्फोसिस फाऊंडेशनचा पुरस्कारही मिळालाय. मूळच्या मुंबईच्याच असलेल्या डॉ. शुभा टोळे यांनी त्यांचं न्यूरोसायन्समधलं उच्च शिक्षण मात्र अमेरिकेत पूर्ण केलंय, तिथेच त्यांनी त्यांची डॉक्टरेटही पूर्ण केलीय. सध्या डॉ. शुभा टोळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च इथे संशोधनाचं आणि विज्ञानाच्या प्रसाराचं काम करतात आहेत,  त्याचबरोबर पुढच्या पिढीला विज्ञान संशोधनाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन देण्याचंही काम करत आहेत.   डॉ.अरुणा ढेरे पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली ... साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे ... यांची कृपा-साऊली; घरात, जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे, ग्रंथांचा सहवास; आणि साहित्याने भारावलेलं एक विलक्षण वातावरण! त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यांतील आर्तता शोधणारी त्यांची संवेदना, आणि एका मातब्बर 'storyteller' चं उपजत 'timing!' डॉ. अरुणा ढेरे आपल्या लेखनाने वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे ठरलंच होतं.सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या २१व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. 07 या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबर 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' सारखी वैचारिक पुस्तकं; 'निरंजन', 'प्रारंभ','यक्षरात्र', यांसारखे कविता संग्रह; कृष्णकिनारा','नागमंडल','मैत्रेय' यांसारखेकथासंग्रह वाचकांच्या वाङ्मयीन प्रवासातील श्रद्धास्थानं बनली आहेत. अरुणाताई ... आपल्या लेखणीला नवनवीन कल्पनांची शाई सदैव मिळत राहो ... ही 'माझाची' सदिच्छा.   रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर….   काही दिवसांपूर्वी जर ही नावं कोणाला विचारलं असतं तर त्यांची ओळख सांगणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत भेटले असते.   मात्र सैराट रिलीज झाला आणि त्यांनी साकरलेल्या आर्ची आणि परशानं अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं. सातवीत असताना रिंकूने गंमत म्हणून सिनेमासाठी दिलेली अॉडिशन, आठवीत असताना झालेलं शूटिंग आणि नववीत झळकलेला सिनेमा. या तीन वर्षांनी तिच्या आयुष्याची सगळी गणितच बदलून टाकली. 08 पदार्पणातच अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवत रिंकूने दिग्दर्शकाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.  पैलवानकी करणाऱ्या आकाशने तर सिनेमाचं कधी स्वप्नंही पाहिलं नव्हतं.  कुस्तीच्या आखाड्यातून थेट रुपेरी पडद्यावर दाखल झालेल्या या वीरानं हे मैदानही तितक्याच तडफेनं जिंकलं. पहिल्याच सिनेमात लोकप्रियतेचं उत्तुंग शिखर गाठणाऱ्या या रिंकू राजगुरु  आणि आकाश ठोसरला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !   उद्योजक हणमंत गायकवाड रहिमतपूर या साताऱ्यातल्या दुर्गंभागात त्यांचा जन्म झाला लहानपणापासून हणमंतरावांची परिस्थिती अत्यंत खडतर होती इतकी की त्यांच्या खिशात एक बसच तिकिट काढायलाही पैसे नसत. त्याकाळापासून सुरू झालेला प्रवास अडचणींचा पालापाचोळा दूर सारत त्यांनी सुरू केला आणि स्वच्छता अभियानाचा वसा हाती घेतला. तसं बघितलं तर साफसफाईचं काम हे हलक्या दर्जाचं काम म्हणून हिणवलं जातं.. पण याच कामाचा वापर करून पुण्यातल्या हणमंत गायकवाड या उद्योजकाने बीव्हीजी या कंपनीची स्थापना केली. १९९७ साली फक्त ८ सहकाऱ्यांच्या साथीने सुरू केलेल्या या कंपनीत आज एकूण 65 हजारापेक्षाही अधिक कर्मचारी काम करतात. आज ही कंपनी राष्ट्रपती भवन, संसद भवन, दिल्ली हायकोर्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांची (क्लिनिंग) स्वच्छता, साफसफाई आणि मेंटनन्सची कामं करते. सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत कंपनीने झेप घेतली आहे. 11 कंपनीचा हा प्रवास सहजसोपा नव्हता, मात्र तो अशक्यलही नव्हता. "पेशन्स' ॲण्ड "क्रेडिबिलिटी' हेच दोन परवलीचे शब्द मानले, सहकाऱ्यांतही तेच बीज पेरले आणि यशाची नवीन शिखरे आपोआप सर होत गेली असं हणमंत गायकवाड सांगतात. बीव्हीजी कंपनीचे नाव सध्या विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे. या कंपनीनं सिव्हील इंजिनीअरींग, लँडस्केप डिझायनींग ॲण्ड गार्डनिंग अशा क्षेत्रातदेखील क्लिनींग आणि मेंटनन्सची कामे करण्यास सुरवात केली आहे. आज या कंपनीची कारर्कीद संपुर्ण जगभरात पसरलीय. भारतात एकवीस तर लंडन आणि सिंगापूर मध्ये कंपनीच्या दोन शाखा उघडण्यात आल्या आहेत. येत्या दहा वर्षांत दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट हणमंत गायकवाड आणि बीव्हीजी कंपनी ठेवते.  उद्योजक हणमंत गायकवाड यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझाच्या शुभेच्छा..   शास्त्रीय गायक महेश काळे गाणं हीच त्याची ओळख… वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तो पहिल्यांदा रसिकांसमोर गायला आणि त्याच्या निरागस सुरांनी सा-यांना मोहून टाकलं. शास्त्रीय गायक महेश काळे…..तिथून सुरु झालेला महेशच्या गात्या गळ्याचा प्रवास म्हणजे त्याच्या लक्षावधी चाहत्यांच्या आयुष्यातील सुरेल चांदणं. पं. जितेंद्र अभिषेकींसारखा गुरु लाभल्यानं महेश काळेच्या गाणं खऱ्या अर्थानं फुलत गेलं अन् स्वत:ची शैलीही त्याने निर्माण केली. पुढे पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्या महेशने अमेरिकेतल्या सँटा क्लारा विद्यापीठातून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयात मास्टर डीग्रीही मिळवली. सूरांच्या मोहिनीमुळे संगीत हाच त्याचा श्वास होता अन् राहिलाय... हे त्याच्या ताना मुरक्यांमधून आपल्याला जाणवतं.  आजवर त्याने जगभरातल्या अनेक देशात हजाराहून अधिक शास्त्रीय संगीताच्या मैफली केल्यात. अमेरीकेतल्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना तो संगीताची संथा देतोय. 10 शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि संगीत नाटकांच्या रसिकांपूरता मर्यादित असलेला महेश खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला तो कट्यार काळजात घुसली या सिनेमातून. या सिनेमात त्याने गायलेली गाण्यांनी लहानांपासून वृद्धांच्या मनावर गारूड केलं.  या सिनेमाच्या पार्श्वगायनसाठी महेशला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिजात शास्त्रीय संगीताला जगभरात पोहोचवणाऱ्या या अभ्यासू अन् मनस्वी गायकाला एबीपी माझाचा सलाम !!!   नागराज मंजुळे माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला….मी कशानेही उपसत राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला.... मनातला हा कोलाहल मांडायला त्याला सिनेमाचं माध्यम मिळालं आणि त्याने जगलेलं वास्तव रुपेरी पडद्यावर अनुभवताना सारा समाज अंतर्मुख झाला. यशा-अपयशाची पर्वा न करता आपल्या कलाकृतीशी प्रामाणिक राहणारा हा मनस्वी दिग्दर्शक, निर्माता अन् अभिनेता... नागराज मंजुळे कवितेतून व्यक्त होत होता. त्याला कॅमेऱ्याची भाषा उमगली आणि मग त्याच्यातला हळवा तरीही विद्रोही कवी कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायला लागला. 02 वास्तवाला थेट भिडणारा, रूळलेल्या समीकरणांना शह देणारा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरत कलात्मकता अन् व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य गाठणारा दिग्दर्शक. त्याच्या सैराटने लोकप्रियतेची व्याख्याच बदलवून टाकली. मराठी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये येऊ शकतो, हे स्वप्न त्याने दाखवलं. त्याचं हे मांडणं... बोलणं रसिकांना पिस्तुल्यात भावलं. फॅण्ड्रीत काळजाला भिडलं आणि सैराटने तर झिंगाट करून सोडलं. समाजातील अश्वत्थाम्याच्या जखमा त्याने नेमक्या जोखल्या अन् समाजातील विसंगतीवर आपल्या माध्यमातून भाष्य केलं. केवळ मराठीच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांना झिंगाट करुन सोडणाऱ्या या सैराट दिग्दर्शकास एबीपी माझाचा सलाम.   नाम फाऊंडेशन सलग तीन वर्ष पडलेला दुष्काळ . सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा बोजा.  या दुष्टचक्रातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला अलिंगण दिलं.  मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळं त्यांच्या अर्धांगिणींसमोर मोठं संकट उभं ठाकलं.. धन्यानं अर्धवट सोडलेला डाव सावरणाऱ्या त्या माऊलीच्या मदतीसाठी दोन मराठी कलावंत धावून आले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे... या दोन प्रतिभाशाली कलावंतांमधल्या खऱ्याखुऱ्या नायकांच्या कल्पनेतूनच जन्माला आली नाम फाऊंडेशन.. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दुख:च्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम नामकडून अविरतपणे सुरूय. 01 नामनं आतापर्यंत ७०० विधवांना प्रत्येकी १५ हजाराची मदत दिली. तसंच नामनं पाच गावं दत्तक घेतली असून त्यांच्या विकासाची धुरा स्वतःच्या खांद्यावर उचललीय. याशिवाय सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उद्धाराचा मार्ग दाखवण्यात नामनं एक पाऊल पुढे टाकलंय. महाराष्ट्रातून दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्यासाठी नामनं अनेक गावात जलसंधारणाची काम हाती घेतली आहेत. एवढंच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी मोफत घरं बांधून देण्याचा प्रकल्पही नामनं हाती घेतलाय. महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या नाम फाऊंडेशनला एबीपी माझाचा सलाम   पाणी फाऊंडेशन मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान आणि सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमातून सामाजिक समस्यांवर तोडगा शोधणारे दिग्दर्शक सत्यजीत भटकळ.  या दोघांनीही दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्याचं स्वप्न पाहिलं आणि जन्म झाला पाणी फाऊंडेशनचा.  जर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचं असेल, तर प्रत्येक गावात जलसंधारणाची कामं झाली पाहिजे, दुष्काळमुक्तीचा हा साधा आणि सरळ फॉर्म्युला पाणी फाऊंडेशननं अवलंबला. 03 जलसंधारणाच्या कामासाठी महाराष्ट्रानं हातात कुदळ आणि फावडं धरावं म्हणून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली. बीडमधलं अंबाजोगाई, अमरावतीमधलं वरूड, आणि साताऱ्यामधलं कोरेगाव. अशा तीन तालुक्यातली ११६ गावं स्पर्धेत सहभागी झाली. पाणी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावानं सर्व शक्ती पणाला लावून जलसंधारणाची कामं केली. आकाशातून बरसणारा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी गावोगोवी जणू श्रमदानाच्या जत्रा भरत होत्या.  पावसाची पहिली सर कोसळली अन् जलसंधारणाची कामं झालेली गावं पाणीदार झाली. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं शिवधनुष्य पाणी फाऊंडेशननं उचललंय. आणि हे शिवधनुष्य ते यशस्वीरित्या पेलणार यात तीळमात्र शंका नाही. महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या पाणी फाऊंडेशनला 'माझा'चा सलाम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Buldhana News : असंवेदनशीलतेचा कळस! अवघ्या 50 फुटावर ग्रामीण रुग्णालय, पण मदतीला कुणीही येईना, अखेर महिलेची तळमळतच रस्त्यावर प्रसूती, खाजगी परिचारिका बनली देवदूत
असंवेदनशीलतेचा कळस! अवघ्या 50 फुटावर ग्रामीण रुग्णालय, पण मदतीला कुणीही येईना, अखेर महिलेची तळमळतच रस्त्यावर प्रसूती, बुलढाण्यात खाजगी परिचारिका बनली देवदूत
Maharashtra Live News Updates: परीक्षेतील गैरप्रकार उघड, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: परीक्षेतील गैरप्रकार उघड, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praja Foundation Mumbai MLA Report Card 2026: काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर; प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर
CTET Exam 2026: 'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
'सीटीईटी' परीक्षा पुन्हा लांबणीवर, नव्यानं अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू; आणखी किती परीक्षा पाहणार? शिक्षकांचा संतप्त सवाल
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Rohit Pawar Speculation to join Congress: रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा?
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
Embed widget