BLOG : आरोग्य, काम आणि कुटुंब... प्राधान्यक्रम काय असावा?

Health is Wealth
Work is Worship
Family is not important thing, it is everything...
आपल्या आयुष्यातील तीन अतिशय महत्त्वाच्या घटकांबद्दल अलिकडेच ही तीन इंग्रजी वाक्यं वाचनात आली. आरोग्य, आपलं काम किंवा कुटुंब. या तीन स्तंभांवर आपलं आयुष्य स्थिरावत असतं. साहजिकच या तिघांचीही भूमिका आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. आता प्रश्न हा उरतो की, या तिन्ही विषयांमध्ये प्राधान्य क्रम काय असावा? किंवा तो काळानुरुप, वयानुरुप बदलावा का? तर या प्रश्नावर खरंच सखोल मंथन होण्याची गरज आहे.
आपण नोकरी करण्यायोग्य वयात येईपर्यंत म्हणजे विशीपार होईपर्यंत आईवडिलांचं डोळ्यात तेल घालून आपल्याकडे लक्ष असतं. पुढे वयाची विशी पार केल्यावर काही मंडळी प्रगत शिक्षण घेतात, तर काही थेट घरच्या परिस्थितीनुसार नोकरी-व्यवसायाची कास धरतात. प्रगत शिक्षण घेतल्यानंतरही दोन-तीन वर्षांतच नोकरी-व्यवसायाची वाट त्याही ऑप्शनमध्ये निवडावीच लागते.
पंचविसाव्या वर्षी तुमचं प्रोफेशनल लाईफ किंवा व्यावसायिक जीवन सुरु झालं असं मान्य केलं तर वयाच्या 58 ते 60 वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे 35 वर्षे तुम्हाला ही तारेवरची कसरत करायची असते. त्यात आताच्या कॉर्पोरेट कल्चरच्या जगात, वाढती स्पर्धा साहजिकच त्यामुळे येणारं परफॉर्मन्स प्रेशर... कामाचे वाढते तास, शिफ्ट ड्युटीज, काही वेळा नाईट शिफ्टमध्येही काम करावं लागतं. कॉर्पोरेटमध्ये काही वेळा पगाराचे आकडे गलेलठ्ठ असतात. त्याच वेळी तुम्हाला कधी कधी 12-12 तासही काम करावं लागतं.
तुमच्या फिटनेसच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही असताना म्हणजे वयाच्या पंचविशीत तुमचा जॉब सुरु होतो. साहजिकच इथे हा क्रम काम, आरोग्य आणि कुटुंब असा असतो. मग तुम्ही जेव्हा उद्योग-व्यवसायात स्थिरावता तेव्हा काळानुरुप प्रापंचिक जबाबदाऱ्याही आपल्यावर येतात. इथे काम-कुटुंब यात तुम्हाला बॅलन्स करायचा असतो. अर्थात आरोग्य सांभाळून. हा टप्पा 30 ते 45 वयोगटातला धरता येईल. तर 45 पासून पुढे तुमचा प्रवास मध्यम वयातून वार्धक्याकडे सुरु होतो.
शरीर हळूहळू तुम्ही केलेल्या मेहनतीच्या किंवा काही वेळा दुर्लक्ष केल्याच्या खुणा दाखवू लागतं. यात परत स्त्री-पुरुष असं वर्गीकरण वेगळं करावं लागेल. कारण, स्त्री आणि पुरुषाचीही मानसिक, शारीरिक स्थिती ही वेगळी विचारात घ्यावी लागेल. इथपासून म्हणजे करिअरच्या 15 वर्षांच्या निर्णायक टप्प्यात (45 ते 60 या वयात) तुमचा प्राधान्य क्रम काय असावा....तर, तो आरोग्य, कुटुंब आणि काम असा असावा. म्हणजे कामाला कमी महत्त्व नव्हे तर, आरोग्य-कुटुंब याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं.
अर्थात या टप्प्यावर आपला आर्थिक आढावा घेऊनच आपण पावलं टाकत असतो. साहजिकच पुढच्या 15 वर्षांमध्ये आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, त्यानुसार, याचं नियोजन करावं लागतं. अर्थात पैसा, मिळणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला कितीही मिळाल्या तरी कमीच वाटतात. तेव्हा आपल्याकडच्या मिळकतीची ब्रेक इव्हन रक्कम किती असावी, हा विचारही ज्याचा त्याचा असतो. इथून पुढे आरोग्य आणि कुटुंब दोन्ही प्राधान्य क्रमात पहिल्या नंबरवर आल्यास आपलं जीवन सुखकर होतं. नाहीतर, आणखी पैसा, आणखी आलिशान जीवनशैलीच्या नादात आपण कुटुंबासोबतचा क्वालिटी टाईम गमावतो.
वयाच्या या पंचेचाळीस प्लसच्या टप्प्यावरही जर आपण पैसे कमवणं हेच ध्येय ठेवलं तर, आपली जीवनशैली आणखी दिमाखदार होईलही. पण, त्या बदल्यात आपण जे मोल देतोय, ते किती आणि कशाचं आहे... याचाही खोलवर विचार करायला हवा. आपण जे पैसे कमावतोय, त्याचा उपभोग घेण्यासाठी प्रकृती किमान पातळीवर चांगली असायला हवी आणि आयुष्यातल्या वार्धक्याकडे कूच करण्याच्या त्या टप्प्यात आपली माणसंही आपल्या सोबत असायला हवीत. किंबहुना त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता यायला पाहिजे. सो, त्या टप्प्यात प्राधान्य हे आरोग्य आणि कुटुंबालाच असावं हे माझं वैयक्तिक मत आहे.
या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ (Mindfullness Teacher) डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, या विषयाशी डील करताना सगळ्यात पहिल्यांदा आपला वर्क लाईफ बॅलन्स बिघडलाय हे आपण स्वीकारायला हवं. मग तुम्ही यातून मार्ग काढू शकता. टाईम मॅनेजमेंट, ध्येय निश्चित करणं यासारख्या मुद्यांमध्ये तुमची गल्लत होतेय, हे स्वीकारून तुम्ही पुढे गेलात की त्यावर उपाय शोधणं, पावलं टाकणं सोपं जातं.
डॉ. राजेंद्र बर्वे पुढे सांगतात की, एखाद्या तज्ज्ञाची यासंदर्भात मदत घेण्याआधी दैनंदिनी लिहावी. तुम्ही ठरवलेली ध्येयं आणि तुम्ही पूर्णत्वास नेलेले मुद्दे याबद्दल अत्यंत डोळसपणे तुम्ही मांडणी केलीत की गोष्टी सोप्या होतात. फोकस्ड राहणं, कामाप्रती निष्ठा राखणं गरजेचं असतं. डेलिगेटिंग वर्क अर्थात कामाबद्दलचा नेमकेपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. आपण नोकरी-व्यवसायामध्ये आपल्यावर असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त इतरांची कामं ओढवून तर घेत नाहीये ना, हेही चाचपून पाहण्याची गरज असते. तिथे आपला वेळ काही वेळा अनाठायी जात असतो. जो आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकतो.
आता कुटुंबाविषयी बोलायचं झाल्यास कुटुंबासोबत टीव्ही पाहिला, सिनेमा पाहिला म्हणजे क्वालिटी टाईम स्पेंड केला असं नव्हे तर, त्यांच्याशी खास करून मुलांशी संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. अर्थात या संवादात डबा खाल्ला का, होमवर्क झाला का, अभ्यास झाला का, परीक्षा कधी आहे असे स्टीरिओ टाईप प्रश्न विचारणं म्हणजे हा संवाद पुरेसा ठरत नाही तर, त्याखेरीज तुम्ही जर मुलांना त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल बोलतं केलंत किंवा दिवसभरातला एखादा गंमतशीर अनुभव त्यांना विचारलात तर मुलं आणखी खुलतात. असाच अनुभव तुम्ही बायकोशी संवाद ठेवताना तिलाही दिवसभरातील अनुभवाविषयी विचारलंत तर नवरा-बायकोमध्ये अधिक सकारात्मक संवाद होऊ शकतो.
आता आरोग्याबद्दल सांगतो. खरं तर या विषयावर आपण बोलू तितकं कमी आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनातही तुम्ही दिवसभरातला किमान एक तास तुमच्यासाठी द्यायलाच हवा, त्या एक तासात योगासनं करा, मेडिटेशन करा, हलका व्यायाम करा. तो एक तास तुमचा स्वत:चा असावा. हा तुम्ही स्वत:शी करत असलेला संवादच असतो.
हलक्याफुलक्या शब्दात सांगायचं तर, आपला वर्क लाईफ बॅलन्स अर्थात WLB नीट राहिला नाही तर आपण क्रिकेटच्या भाषेतील LBW होण्याची शक्यता असते, असं सांगत डॉ. बर्वेंनी या विषयाची आपल्या आयुष्यातलं मर्म आणि महत्त्व अधोरेखित केलं.
ट्रेंडिंग न्यूज























