Coriander Rate : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात विकली गेलेली कोथंबीर (Coriander Rate) आज पुन्हा महागली असून नाशिकमध्ये (Nashik) कोथंबीर जुडी तब्बल शंभर रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे गृहिणींची डोकेदुखी वाढली असून स्वयंपाकात वापरली जाणारी कोथंबीरचं भाव खाऊ लागल्याने फोडणी महागली आहे. 


सध्या दिवाळीचे (Diwali) दिवस असून किराणापासून ते भाजीपाला (Vegetables) पर्यंत सर्वच गोष्टीच्या खरेदीवर जोर दिला जात आहे. दरम्यान रोजच्या जेवणात चवीसाठी वापरली जाणारी कोथिंबीरसुद्धा पुन्हा महागाईच्या शर्यतीत उतरली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात कोथंबीरीला 200 भाव मिळाला होता. आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. त्यानंतर कोथंबीरीने माघार घेत ३० ते चाळीस रुपयांवर जुडी आली होती. त्यातच परतीच्या पावसाने देखील उघडीप दिल्याने मालाची अवाक वाढली होती. परिणामी भाव वधारला होता. 


दरम्यान दिवाळीच्या दिवस सगळीकडे लगबग सुरु असून शहरात वास्तव्यास आलेले तसेच रोजगारासाठी शहराकडे आलेलं मजुरांसह शेतमजूर आता गावी परतले आहेत. त्यामुळे शेतीकामात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच शेतमाल शेतातच पडून असून याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. त्यामुळेच कोथंबीरीचे भाव वधारले आहेत.शेतमजूर नसल्याने कोथंबीर काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने बाजारात आवक कमी झाली आहे.परिणामी दरात वाढ झाली असून जवळपास शंभर रुपयाला कोथंबीर जुडी मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोथिंबिरचा स्वाद घेणे महाग झाले असून मजुराचा तुटवडा निर्माण झाल्याने थेट परिणाम आवकवर झाला आहे.


दिवाळीमुळे शेतमजूर गावी गेल्याने दोन दिवसांपासून कोथिंबिरसह अन्य शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. तर आठ दिवसांपूर्वी कोथंबीर जुडी चाळीस रुपयाला मिळत होती. तर आज जुडीचा भाव शंभर रुपयांवर पोहचला आहे. 


शेतमाल काढण्यासाठी मजूरच नाही... 
खरंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होतं. नाशिक मधून मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये भाव वाढल्यानंतर मुंबईमध्ये देखील भाजीपाल्याचे भाव वाढतात. आजच्या घडीला नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे भाव कमी अधिक प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान दिवाळीसाठी मजूर गावी गेल्याने शेतातून माल काढणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मजूरच नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे विशेष करून भाव वाढल्याचे परिस्थिती पाहायला मिळते. पालेभाज्या आणि भाजीपाल्यांची आवक घटल्याने मागचे काही दिवसांपासून हे भाव वाढत आहेत. येणाऱ्या काळात देखील भाजीपाल्याची आवक वाढली नाही, तर अशाच प्रकारे भाव असतील असे देखील अंदाज आहे.


असे आहेत आजचे व आठ दिवसांपूर्वीचे दर  


कोथिंबीर         40                100
टोमॅटो           100                 50
फ्लॉवर           50                  40
कोबी             20                  40
मेथी              30                  50
पालक           10                  30
वांगे               40                100
पुदिना             5                  15
वाल              40                  90
भेंडी              25                  50