मुंबई: भारतीय इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाची असलेली सविनय कायदेभंग चळवळ आजच्याच दिवशी मागे घेण्यात आली. ताजमहल जिच्या स्मरणार्थ बांधला आहे त्या मुमताज महलचं आजच्या दिवशी निधन झालं. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 


1632 : मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज हिचे निधन


मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज बेगम (Mumtaz Mahal) हिचा मृत्यू 17 जून 1631 रोजी झाला. 14 व्या मुलाच्या जन्मादरम्यान मुमताजचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. मुमताज आणि शहाजहानला चौदा मुले होती, ज्यात जहाँआरा बेगम (शाहजहानची आवडती मुलगी) आणि क्राऊन प्रिन्स दारा शिकोह आणि आलमगीर औरंगजेबचा समावेश आहे. दारा शिकोहला मारून 1658 मध्ये औरंगजेब सहावा मुघल सम्राट म्हणून त्याच्या वडिलांच्या गादीवर आला. मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने यमुनेच्या काठावर आग्रा येथे प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहलची (Taj Mahal) निर्मिती केली. मुमताज महलच्या नावावरून त्याला ताजमहाल असे नाव देण्यात आले.


1756 : नवाब सिराजुद्दौलाने 50 हजार सैनिकांच्या मदतीने कोलकात्यावर हल्ला केला.


1799 : नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला.


1839 :  लॉर्ड विल्यम बेंटिकचे निधन


लॉर्ड विल्यम बेंटिक (Lord William Bentinck) यांची भारतातील कारकीर्द 1828 - 1835 अशी होती. त्याने भारतात अनेक पुरोगामी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. बेंटिक यांने 1829 चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला. प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला. बेंटिकने लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा 1835 चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत संमत केला. 


निर्दोष आणि दुर्बल लोकांना लुटणाऱ्या डाकूंचा व हत्यारांचा समूह 'ठगांचा' बंदोबस्त केला. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले. बालहत्त्या आणि नरबळीवर बंदी आणली. लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला. 1835 मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली. 17 जून 1839 रोजी त्याचं निधन झालं. 


1917 :  महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे साबरमती आश्रमातील हृदय कुंज या टिकाणी रहायला गेले. 


1933  : सविनय कायदेभंग चळवळ मागे


सविनय कायदेभंग चळवळ (Civil Disobedience Movement) ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने 14 फेब्रुवारी 1930 रोजी झाली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, 50 टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, 50 टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या.


सरकारने महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता. त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह (Salt March) करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली आणि 12 मार्च 1930 रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला (Dandi March)निघाले. 5 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मिठाचा कायदा मोडला. 


1938 : जपानने चीनच्या विरोधात युद्ध पुकारलं


एकीकडे जर्मनी, इटली आणि स्पेनने आक्रमक धोरण स्वीकारत युरोपमध्ये शेजारील राष्ट्रांवर हल्ल्याची तयारी सुरू केली असताना आशियामध्येही त्याचे लोन पसरले. वसाहतवादी धोरण स्वीकारणाऱ्या जपानने चीनच्या विरोधात युद्ध (China Japan War) पुकारले. दुसऱ्या महायुद्धात जपानने जर्मनी आणि इटलीसोबत युद्धात भाग घेतला. जपानने मुसंडी मारत अर्ध्या चीनवर कब्जा मिळवला. पण नंतर पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या मदतीला युद्धात उतरली आणि युद्धाचं पारडं पलटलं.


1970 : शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लॅन्टची शस्त्रक्रिया करण्यात आली


1991 : भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 


2004 : मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.


2008 : 'तेजस' विमानाची पहिल्यांदाच यशस्वी चाचणी करण्यात आली.