Maharashtra Konkan Temperature : अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण तापणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील हवामानाचा पारा वाढणार आहे. विशेषकरुन कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एका दिवसात चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान वाढणार आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केले आहे. त्याबाबतचं परिपत्रकही जारी केले आहे. त्याशिवाय या उष्णतेच्या लाटेचा फटका फळे आणि भाज्यांवर होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 


चिपळूण-रत्नागिरी, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  9 मार्च रोजी सामान्य कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्यास फळे, भाज्या यांवर परिणाम होऊ शकतो. आंबा-काजूवर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो..


फळ-भाज्यांना फटका बसण्याची शक्यता 


उष्णतेच्या लाटेचा फटका फळ भाज्यांना बसण्याची शक्यता आहे. आंबा, काजू, चिकू, केळी, नारळ, सुपारी, नवीन फळबाग लागवड, कलिंगड, भाजीपाला पिके, पुळपिके त्याशिवाय कडधान्य पिके...याला फटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी फळ भाज्यांची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. 


पशुसंवर्धन महत्वाचं - 


जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच उष्णणतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर एक टक्के गुळपाणी आणि 0.5 टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करुन शिंपडावे.. उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावारांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. दुपारच्या वेळीस जनावारांची सावलीत सोय करावी. कुकुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी.. त्याशिवाय छप्पर गवताने झाकावे. 


शेतातील कामे करताना? 


दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळी शेतात जाऊ नये. दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी ठेवावे... पाण्याचे सेवन करावे.. शक्यतो शेतातील कामे सकाळी आणि सांयकाळी चार नंतरच करावे... 


काय काळजी घ्यावी - 


दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे.. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. 


उष्माघातामध्ये काय करावे, काय करु नये ?


उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका.
विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.
सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल.
ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा.
त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा.
घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा.
तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका.