Maharashtra weather News : महाराष्ट्रातील (Maharashtra) वातावरणात बदल होत आहे. एका बाजूला तापमानात (Temperature) वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाऊस (Rain) पडत असल्याचंही चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आजपासून पुढील आठवडाभर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. 16 मे पर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे. या काळात वीज, वारा, पाऊस, गारा पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीय. 


16 मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसाचा इशारा


हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागात जोरजार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार 16 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी गडगडाटीसह वीज, वारा, गारांसह पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. विशेषतः महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात रविवार 12 मे पासून त्यापुढील 5 दिवस म्हणजे गुरुवार दिनांक 16 मे पर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपीटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे खुळ म्हणाले.


कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता


पुढील पाच दिवसात  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार 16 मे पर्यंत सरासरी इतका म्हणजे 35 व 25 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमान राहणार आहे. तिथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस इत्यादी सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसून केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण जाणवेल, असे वाटते. 


अहमदनगरसह नागपूरमध्ये जोरदार पाऊस


अहमदनगरसह नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे.भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसामुळं फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. या पावसाचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभांनाही फटका बसणार आहे. 


चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात उष्णतेची लाट जाणवणार नाही


एकंदरीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही असे माणिकराव खुळे म्हणाले. मतदारांनी विशेषतः सकाळ व दुपारच्या प्रहरात म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान उरकल्यास त्यांना अवकाळी वातावरणाचा  कोणताही विशेष अडथळाही जाणवणार नाही. 


महत्वाच्या बातम्या:


Nagpur News: भरदिवसा आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेलं, पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, नागपूरमध्ये 58 वर्षातील विक्रमी पाऊस