Heat Wave : राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या आसपास गेला आहे. या उष्णतेचा मोठा त्रास राज्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या (Heat Wave) पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी राज्य सरकारनं एक कृती आराखडा तयार केला आहे.


बीपी आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्या नागरिकांना काळजी घ्यावी 


50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे कर्मचारी आणि मजूर यांनी या उष्णतेच्या काळात काळजी घ्यावी. ज्या नागरिकांना बीपी आणि मधुमेह यांसारखे आजार आहेत (जे लोक बस ड्रायव्हर आणि पोलीस हवालदार) अशा लोकांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कामाच्या योग्य वेळांमध्ये बदल केला जाईल.   


शाळा आणि कॉलेजची वेळ सकाळची करावी


परीक्षांव्यतिरिक्त शाळा आणि कॉलेज हे सकाळच्या वेळेत भरवता येईल. उष्णतेच्या काळात कार्बोनेटेड, उच्च प्रथिनेयुक्त पेये, चहा आणि कॉफी टाळावी असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. मजुरांसाठी कामाच्या सुरक्षीत वेळा ठेवाव्यात. यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला प्राधान्य द्यावे. उष्णतेचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड राखून ठेवावेत अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत.


प्राण्यांसाठी, पक्षांसाठी पाणी ठेवावं


पाळीव प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी  किंवा भटक्या प्राण्यांसाठी पाण्याची भांडी भरुन ठेवावीत. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यासह मुंबई प्रदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे उष्णतेच्या लाटेसाठी असुरक्षित असल्याचे म्हटलं आहे.


13 जिल्ह्यात उपायोजना करणं गरजेचं


महाराष्ट्राने 13 जिल्ह्यात उपायोजना करणं गरजेचं आहे. कारण या 13 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या 13 जिल्ह्यांमध्ये विदर्भातील नऊ आणि मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. उष्णतेचा त्रास होऊ नये आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सचना राज्य सरकारनं केल्या आहेत.


खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अनेक लोकांना उष्णतेचा त्रास झाला आहे. यामध्ये  उष्माघातामुळं 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 375 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. अलीकडच्या काळात  विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 40 अंशावर; कागल तालुक्यात एकाच गावातील उष्माघाताने तिघांचा मृत्यू? आरोग्य विभागाने केला खुलासा