फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज दिलाय.दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्रात..

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामानात चढउतार दिसत आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी कडाक्याची थंडी तर कधी अवकाळी पावसाचा अंदाज या वारंवार होणाऱ्या बदलामुळे राज्यात नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून थंडी कमी झाली असून पहाटे हलका गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार (IMD Forecast), आता फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक, डॉ मृत्यूंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान व कमाल तापमान आता चढे राहणार असून मुंबईसह किनारपट्टी भागात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. (Temperature Alert)
देशभरात नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे थंडीला सुरुवात होते. थंडीचा हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत असतो. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन उन्हाचा कडाका जाणवू लागतो. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज दिलाय.दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांत काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाजही देण्यात आलाय. (February Weather)
काय दिलाय हवामान विभागाने अंदाज?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या हवामान अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची स्थिती आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय असून मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. म्हणजेच कमजोर आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होऊन तो पुन्हा तटस्थ होणार आहे. असं हवामान विभागानं वर्तवलंय. (IMD)
येत्या पाच दिवसात कसे राहणार हवामान?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानाचा पारा घसरणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान 1-4 अंशांनी वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. या महिन्यात बहुतांश ठिकाणी तापमान चढेच राहणार असून चार ते पाच दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. (Maharashtra Weather Alert)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
