Water Crisis अमरावती : निसर्ग सौंदर्यान नटलेल आणि विदर्भाच नंदनवन म्हणून लौकिक मिळवलेला मेळघाट (Melghat) सध्या भीषण पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करीत आहे. मेळघाटच्या अनेक ग्रामीण भागात हांडाभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. मेळघाटमध्ये मोठ्याप्रमाणत आदिवासी पाडे आणि दुर्गम स्थळी खेडीपाडी आहेत. येथील जवळ जवळ सर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय.


मात्र ते पाणी सुध्दा घरपोच मिळत नाही. टँकरद्वारे मिळणारे पाणी आधी विहीरीत टाकले जाते आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीतून काढून प्यावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना आता टँकरचा शेवटचा आसरा उरला असून पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.


मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांचीच दांडी?


राज्यातील पाणीटंचाईच्या (Water Crisis) गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज आढावा बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार असून, पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. काही ठिकाणी पाणी हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मात्र ज्याच्या हातात जिल्ह्याची सगळे सूत्रे असतात असे पालकमंत्रीच बैठकीला  नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काही पालकमंत्री विदेशात आहेत. तर काही पालकमंत्री दर्शनासाठी राज्याबाहेर आहेत. त्यामुळे अनेक पालकमंत्री बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. मात्र या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आज ठोस उत्तर राज्यातील खेडोपाड्यात ग्रामस्थांना मिळेल का, याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.


वर्ध्याला वादळ वाऱ्याचा तडाखा, 25 घरावरील टिनाचे छप्पर उडाले 


एकीकडे पाणी टंचाईचे भीषण सावट असताना विदर्भात अवकळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील मुरदगाव या गावात रात्री झालेल्या वादळाने घराची छपरे उडाली आहे. सुमारे 25 घरांची छपरे उडाल्याने गावातील नागरिकांना रात्र उघडयावर काढावी लागलीय. विद्युत तारे तुटली, अनेक झाडांची पडझड देखील झालीय. रात्रीच्या 30 मिनिटांच्या वादळ वाऱ्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. 12 तास उलटून गेल्यावरही प्रशासनाचे अधिकारी पोहचलेच नाही. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावकरी रात्रभर प्रतीक्षेत राहिले. तर अनेक जणांच्या घरचे अन्नधान्य ओले झाले आहे. 


पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा


ग्रामीण भागांत घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. जलस्राोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांतील तब्बल 10 हजार गाव-पाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे पाणी आणि चाराटंचाईमुळे विशेषत: दूध उत्पादक शेतकरी संकटात आलाय.. चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीये..  मराठवाड्यात पाण्याअभावी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच दुधाला चांगला भाव नसल्याने शेतकरी पशुधन विकू लागले आहेत. पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे. अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळ-पाणीटंचाई अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. शेतातील पिके जगवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय.


इतर महत्वाच्या बातम्या