Suicide Cases in Maharashtra : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातच एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केल्या आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमूळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB Report) अहवालातून ही धक्कादायक आणि लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.


दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या


राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 1941 आत्महत्या झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर कर्नाटकात 1335 आणि आंध्र प्रदेशात 815 जणांनी दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. राज्यात बेरोजगारीमुळे 642, गरिबीमुळे 402 आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे 640 नागरीकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. 


कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त


राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास 6961 आत्महत्या झाल्याचं अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या झाल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे.


देशात दर तासाला 19 आत्महत्या 


2021 मध्ये 1,64,033 आत्महत्या झाल्या होत्या तर, 2022 मध्ये 1,70,924 आत्महत्या झाल्या. यापैकी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात 13.3 टक्के, तामिळनाडूमध्ये 11.6 टक्के, मध्य प्रदेश नऊ, कर्नाटक आठ आणि पश्चिम बंगालमध्ये 7.4 टक्के नोंदल्या गेल्या आहेत. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून गणना केली तर 2022 मध्ये देशात दर तासाला 19 लोक आत्महत्या करतील. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात.


गंभीर आजारही आत्महत्येचं कारण


देशभरातील 18.4 टक्के आत्महत्यांमागे गंभीर आजार हे कारण होते. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम आणि गोवा या राज्यांमध्ये रोगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.