Maharashtra ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. अशातच काल (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत झालेल्या कालच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. सकाळी 11 वाजता माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणेनंतर तरी आता एसटी कर्मचारी संपाला (ST Workers Strike) ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 


राज्य सरकारच्या या प्रस्तावावर आता संपकरी चर्चा करणार असून यावर आज सकाळी निर्णय घेण्यात येईल असं आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीला आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यानंतर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. 


...तर संपातून बाहेर पडतो : गोपीचंद पडळकर


राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यानंतर अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केल्याची घोषणा केली त्यावेळीही हे दोघे उपस्थित होते. त्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाल्याचं दिसून येतंय. यामध्ये आम्ही जर राजकारण करतोय असं वाटत असेल तर संपातून  बाहेर पडतो असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे. 


कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय, अनिल परबांची घोषणा


एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारण: ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.


काल (बुधवारी) एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये चर्चा झाली. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यावेळी या प्रस्तावाला अजित पवारांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यानंतर याला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला  600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :