Maharashtra Rain : महाराष्ट्रात 1 जूनपासून ते 26 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain) झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद ही दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) झाली आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत 67 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 26 जुलैपर्यंत मराठवाड्यात 458 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सरासरी 274.5 मिमी पाऊस पडत असतो. यावर्षी मात्र, अधिक पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्या पावसानं उघडीप दिल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसानं जोर पकडला आहे. जुलै महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.


कुठे किती पावसाची नोंद झाली


26 जुलैपर्यंत मराठवाड्यात 458 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात 32 टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात आत्तापर्यंत 459.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात प्रत्यक्षात 347.3 मिमी सरासरी पावसाची नोंद होत असते. मात्र, यावर्षी अधिक पावसाची नोंद झाली आहे.  कोकण आणि गोव्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. कोकणात 16 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 1580.08 मिमी पाऊस होत असतो, मात्र प्रत्यक्षात यावर्षी 1837.01 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे नांदेड, नाशिक, वर्धा, लातूर, उस्मानाबाद, परभणी, गडचिरोली, नागपूर आणि पालघरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. 


मराठवाड्यात पावसामुळं 45 जणांचा मृत्यू


सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं  धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा (Marathwada) आणि  विदर्भाला (vidarbha)  या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमध्ये मराठवाड्यात आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.


शेती पिकांचेही मोठं नुकसान


जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे. अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: