Maharashtra Rain Live Updates : राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : राज्यात जोरदार पाऊस  कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2022 10:13 AM
Nashik Rain : नाशिक शहर परिसरात पावसाची उघडीप, सूर्यदर्शनही झाले!

Nashik Rain : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरु असलेली संततधार अखेर थांबली असून आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सकाळपासून आल्हाददायक वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही झाल्याने नागरिक घराबहेर पडत आहेत. तर दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्याने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. 

अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत भुईसपाट

Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर सर्वदूर पावसाचे तांडव सुरु आहे. वादळी पावसामुळं दुर्गम आदिवासी भागातील सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालयाची इमारत रात्री भुईसपाट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत असून पावसाचा हाहाकार माजला आहे . रात्री झालेल्या पावसाने जोगेश्वरी विद्यालय, सावरकुटे अक्षरशः भुईसपाट केले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली. मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी, नववी व दहावीच्या वर्गासाठी वर्गखोल्या उभारल्या होत्या. सगळं अगदी व्यवस्थितपणे चालू होते. आठवी , नववी , दहावीचे विद्यार्थी भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत होते. पण वादळी पावसामुळं रात्रीच्या वेळेस शाळेची इमारत पूर्ण पडली आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली शहरातील काही कुटुंबांचे स्थलांतर

Sangli Rain : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पातळी 30 फुटांवर गेली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट या पूर पट्ट्यामधील सहा कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. सूर्यवंशी प्लॉट मधील दोन घरात पाणी घुसले आहे. आणखीन पाण्याची पातळी वाढली तर सांगलीच्या विस्तारित भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतः हुन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे. पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करु नये असे आवाहन केले आहे.

भोर तालुक्यातील भाटघर धरणातून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

Pune Rain : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणातून साडेसात हजार क्युसेक इतक्या वेगाने निरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. भाटघर धरण हे ब्रिटिशकालीन धरण असून या धरणाला 85 स्वयंचलित दरवाजे आहेत. त्यापैकी 12 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. 

उजनी आणि वीर धरणातून विसर्ग, पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरात शिरलं पाणी

उजनी आणि वीर धरण (Ujani Veer Dam) 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत (Chandrabhaga Neera River) मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागल्याने येथील देवांच्या मूर्ती हलविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.

सांगली जिल्ह्यातील औदुंबर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले कृष्णेचे पाणी

Sangli Rain : सांगली जिल्ह्यातील औदुंबर मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कृष्णा नदीचे पाणी पोहोचले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी मंदिरापर्यंत पोहोचले आहे.  सांगली जिल्ह्यातील तिर्थ क्षेत्रापैकी श्री क्षेत्र आौदुंबर हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे. तासगाव तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पवित्र काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे.

नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पुराच्या पाण्याखाली, कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

Kolhapur Rain : कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर वसलेलं श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पुराच्या पाण्याखाली गेले आहे. श्री दत्त मंदिराचा कळस वगळता पूर्ण मंदिर पाण्याखाली बुडालं आहे. कोयना आणि राधानगरी धरणाचा विसर्ग पाहता कळसही लवकरच बुडण्याची शक्यता आहे. दर्शन मूर्ती मंदिर परिसरातील वरील भागात आणून पूजा अर्चा सुरु आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडीचं दत्त मंदिर आहे.

 कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला  जाणार

 कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला  जाणार आहे. 2 लाख 25 हजार क्यूसेकने विसर्ग होणार आहे. विसर्ग वाढवला जाणार असल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. 

मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं तरुणाला पडलं महागात

Pune Rain : पुण्याच्या मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं एका तरुणाला महागात पडलंय. कुंडमळा येथे हा तरुण मित्रासोबत पाण्यात घुसला होता. त्यावेळी नको ते धाडस तो करत होता, वाहून जाण्यापूर्वी (लाल शर्ट घातलेला) तो करत असलेली मस्ती कॅमेऱ्यात ही कैद झाली. त्यानंतर काही वेळातच तो वाहून गेला. वैभव देसाई असं त्याचं नाव असून तो मूळचा गोव्याचा असून, सध्या तो पिंपरी चिंचवडमध्ये राहत होता.

खबरदारीचा उपाय म्हणून NDRF ची एक टीम सांगली जिल्ह्यात रवाना

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सतत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची एक टीम  सांगली जिल्ह्यात रवाना झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात भूस्खलन

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात भूस्खलन झाले आहे. करंजफेण इथल्या धावडा खिंडीत भूस्खलन झाले आहे. रस्त्याबर मलबा पसरला आहे. मलबा बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



कोयना धरणातून 8000 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने पूर्वनियोजनानुसार आज दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2 हजार 100 क्युसेक्सने विसर्ग चालू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळं कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Pune Rain Updates : पुण्याच्या मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं एका तरुणाला पडलं महागात

Pune Rain Updates : पुण्याच्या मावळमध्ये पाण्याच्या प्रवाहाशी खेळणं एका तरुणाला महागात पडलंय. कुंडमळा येथे हा तरुण मित्रासोबत पाण्यात घुसला होता. त्यावेळी नको ते धाडस तो करत होता, वाहून जाण्यापूर्वी (लाल शर्ट घातलेला) तो करत असलेली मस्ती कॅमेऱ्यात ही कैद झाली. त्यानंतर काही वेळातच तो वाहून गेला. वैभव देसाई असं त्याचं नाव असून तो मूळचा गोव्याचा अन सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा आहे. काल आकुर्डी येथील मित्रासोबत तो वर्षाविहाराचा आनंद घ्यायला आला होता. तेव्हा ही घटना घडली. 

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूर पट्ट्यातील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना

Sangli Rain : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळं सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरु करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरुन दिल्या जात आहेत. सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटसह सिध्दार्थ परिसर, मगरमच्छ कॉलनी परिसरातील नदीकाठचा भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mumbai Rain : मुंबईच्या माहीम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत वाहून गेले, एकाचा मृत्यू

Mumbai Rain : मुंबईच्या माहीम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मध्यरात्री माहीम खाडीवर उभे असताना एका मित्राचा पाय घसरल्यानं तो वाहून गेला त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानं धाव घेतली असता तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्यानं अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आलं नाही. मात्र पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्याची नावं आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात अजूनही पूरस्थिती कायम

गडचिरोली जिल्ह्यात अजूनही पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गोसेखुर्द धरणातून 16 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला महापूर, जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क तुटला

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या बारा तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, अकोला व अमरावती जिल्ह्यातील अनेक जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आल्याने पूर्णा नदीला महापूर आला आहे. अनेक ठिकाणी नदी काठची शेती पाण्याखाली गेली आहे. तर नांदुरा - जळगांव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील येरळी पूल अजूनही पाण्याखाली असल्याने हा महामार्ग गेल्या 12 तासांपासून ठप्प आहे. जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र,  धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्य मार्गांवर पाणी आलं आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे. 


पुणे पाऊस


भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे  जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात संसतधार पाऊस सुरु आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यासोबतच  लोणावळ्यात (Lonavala)  वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोणावळ्यात अधिक पाऊस पडला आहे.


विदर्भातही पावसाची हजेरी. विदर्भातही जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर भंडाऱ्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.