उस्मानाबाद : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी केली.  राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मदतीचे वाटप 13 मे 2015 च्या शासकीय आदेशानुसार केले जाणार आहे. मंगळवारपर्यंत नुकसानीचा अहवाल जाणार आहे. त्यानंतर मदतीचे वाटप सुरू करण्याचे नियोजन केले जात आहेत.


अतिवृष्टीग्रस्त जिल्हातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. नुकसानग्रस्तांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे. तर शेतीच्या भरपाईसाठी शासनाने आता नवे निकष तयार केले असून त्यानुसार भरपाई मिळेल.


2015 मधील निर्णयानुसार मिळणार अशी भरपाई


दुधाळ जनावरे : 30,000
मेंढी, बकरी, डुक्कर 3,000
उंट, घोडा, बैल : 25,000
वासरू, गाढव, शिंगरू, खोचर : 16,000
कुक्कुटपालन : प्रतिकोंबडी 50 रुपये


सखल भागातील पक्के घर पूर्णतः पडझड : 95,100
दुर्गम भागातील घर पडझड : 1,01,900
व्यक्ती मृत: प्रत्येकी चार लाख वारसांना
पक्की घरे 15 टक्के पडझड : 5,200
कच्चे घर 15 टक्के पडझड: 3,200
पडझड तथा नष्ट झोपड्या : 4,100
घराला जोडून असलेला गोठा: 2,100


अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा


परतीच्या पावसाने उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला. या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं. या अतिवृष्टीमध्ये काही व्यक्तीचा देखील बळी गेला. तर अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या चार बाबींवर आधारित पंचनामा अहवाल पाठवावा, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आता मंगळवारपर्यंत अहवाल शासनाला सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित जिल्ह्यांना वितरित केली जाणार आहे.


जिल्हास्तरावरुन चार घटकांवर पंचनामे अहवाल शासनाने मारगविल्याने तत्काळ मदत करणे शक्य होणार आहे. पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हानिहाय मदतीची रक्कम निश्चित करुनती काही दिवसांत वितरित केली जाणार आहे.



मुख्यमंत्र्यांनी काय केली होती घोषणा?


10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा  करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं.


रस्ते- पूल - 2635 कोटी
नगर विकास - 300 कोटी
महावितरण ऊर्जा - 239 कोटी
जलसंपदा - 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - 1000 कोटी
कृषी-शेती-घरासाठी - 5500 कोटी


जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत
शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.  नुकसानग्रस्तांकरता 10 हजार कोटी रुपयांची मदत नम्रपणे जाहीर करत आहोत, कृपाकरुन त्याचा स्वीकार करावा. दिवाळीआधी सगळ्यांपपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं



केंद्राकडून 38 हजार कोटी रुपये येणं बाकी
तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंं होतं. "केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईकरता 1065 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारकडून राज्याचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याची पत्रे, स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत. अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारकडून पाहणीकरिता  पथक येते, 2 ते 3 वेळा केंद्रास आठवण केली आहे परंतु अद्याप पथक आलं नाही," असं ठाकरे म्हणाले होते.