Nitesh Rane Letter To CM : शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी  हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय असं म्हटलंय, नेमकं काय आहे पत्रात, जाणून घ्या


नितेश राणेंनी पत्रात म्हटलंय...


नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात, 


"माननीय मुख्यमंत्री महोदय, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय, कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी रण्यात आली. त्याला आता 30 एप्रील रोजी 12 वर्षे पूर्ण होतील, परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात."


कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगसाठी
नितेश राणे म्हणतात, "महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना, हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगसाठी केला जातोय"


सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात खदखद
"स्व. बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच, आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे." असे नितेश राणे पत्रात म्हणतात.


महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचीमध्ये समावेश का नाही?
पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचीमध्ये का केला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्रच्या अस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचीत समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेलं शंकेच मोहोळ शांत करावं, अशी मागणी या पत्रात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.