Nana Patole : राज्यातील सरकार किती क्रूर आहे, हे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आज बोलताना पाहायला मिळालं. मुंबईत सहा दिवसात 27 लाख लोकांचा सर्व्हे केले ते कशाच्या आधारावर केले. मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून थातूर मातूर अहवाल आणला आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे असं म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिलीय. राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यावर पटोलेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केलेत.


 


सहा दिवसात 27 लाख लोकांचे सर्व्हे कुठल्या आधारावर केले?


राज्य सरकारकडून तरुणांची, शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की या आंदोलनाचा निवडणूकीवर काही परिणाम होत नाही असं म्हणाले. मागासवर्ग आयोगाने सकाळी अहवाल दिला. सहा दिवसात 27 लाख लोकांचे जे सर्व्हे केले. ते कशाच्या आधारावर केले? राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे का? असा सवाल देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारला केला आहे. 


 


लोकांना फसवण्याचं काम हे सरकार करत आहे - नाना पटोले


नाना पटोले पुढे म्हणाले, काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की या आंदोलनाचा निवडणूकीवर काही परिणाम होत नाही असं म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचा ठराव करुन आरक्षण दिल, मात्र त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले. जो मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून छातुर मातूर अहवाल आणला आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगाचे सदस्य मेश्राम यांनी काही मुद्दे काढले तर त्यांना आयोगातून काढून टाकलं, त्यामुळे लोकांना फसवण्याचं काम हे सरकार करत आहे, असं ते म्हणाले.


 


मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार


20 फेब्रुवारीला होणाऱ्या या अधिवेशनात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येईल. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय खास अधिवेशन बोलावलं आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषदेत म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असंही आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. 


हेही वाचा>>>


CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती