Maharashtra Political News : खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याच षडयंत्र केलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्पोट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात, जे होत आहे ते पाहावे, अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिले आहे. जळगावात एका भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते, कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.



कोणी धमकी दिली हे जाहीर करावं- गुलाबराव पाटील


अंधेरी विधानसभा निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी असे भावनिक पत्र मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिले आहे. यावर प्रश्न विचारला असता या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्षाचा आहे असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. शिंदे गटाकडून धमक्या दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी  जळगावातील एका मेळाव्यात केला आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे मत व्यक्त केला आहे. कोणी धमकी दिली हे जाहीर करावं वाऱ्याला लाथा मारू नये. माझा धंदा हा लोकांची कामे करण्याचा आहे धमकी देण्याचा नव्हे, जे काम करत नाही ते अशाच पद्धतीने उलट्या गोष्टी करतात त्यामुळे त्यांनी काम करावं, लोकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवू नये असे उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिले आहे.


अनुदान जमा करण्याची शासनाची प्रक्रिया सुरू


नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपयांच्या अनुदान जमा करण्याची शासनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुद्धा या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.