Aditya Thackeray : तुम्ही पण ठाकरे आणि मी पण..आपण एकत्र काम करून गावाची समस्या सोडवू. "ठाकरेंना ठाकरेंचा शब्द" असल्याचे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांना आश्वस्थ केले, नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?


"तुम्ही पण ठाकरे आणि मी पण ठाकरे..."
शहापूर तालुक्यातील बिवलवाडी गावासह आसपासच्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच बिवलवाडी गावात ठाकरे आडनावाच्या कुटुंबियांची संख्या अधिक असल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या गावात पाहणी दौऱ्यासाठी गेले असता गावातील महिला यांनी पाणी टंचाईबाबत त्यांना माहिती देताच, त्यावर तुम्ही पण ठाकरे आणि मी पण..आपण एकत्र काम करून गावाची पाणी समस्या सोडवू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावली धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तो पूर्ण होईपर्यंत या गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी टोपाची बावडी येथून पाणी लिफ्ट करून आणू. त्यासाठी कामाला सुरुवात देखील करण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले.  शिवाय वीज पुरवठा होत नाही, त्या ठिकाणी सोलर पंप बसवून पाणी येईल. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 
316 कोटी रुपयांच्या भावली पाणी पुरवठा योजनेला मंजुरी


"ठाकरेंना ठाकरेंचा शब्द" असल्याचे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी गावातील महिलांना आश्वस्थ केले. यावेळी त्यांनी कसारा घाटात असलेल्या आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या टोपाच्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीत पाणी साठवून ते लिफ्ट करून गावापर्यंत नेण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी,गोलभन, याठिकाणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली, या तालुक्याची पाणी टंचाई कायमची दूर व्हावी म्हणून सरकारच्या मार्फत 316 कोटी रुपयांच्या भावली पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे, परंतु ही योजना पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागतील तो पर्यंत काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला.



शहापूरच्या दुर्गम भागातील गावात मंत्री ठाकरेंची जमिनीवर बसून चर्चा.. 


गावकऱ्यांच्या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की, आपली परिस्थिती पाहायला मी तुमच्या गावात आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी, गोलभान या दुर्गम भागातील जनतेला दिलासा दिला. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न मिटेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य सांगितल्यानंतर सौरऊर्जेच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वस्त केले.


भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी .. 


यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले, शहापूर, पालघर, ठाणे याभागात पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे दुर्गम भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वन तलाव, विहिरी यांच्या माध्यमातून भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी आणून विहिरीत टाकले जाईल आणि त्यानंतर सोलर पंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल असे सांगितले.  शहापूर तालुक्यातील माळ त्यानंतर पालघर जिल्ह्यातील सावर्डे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन मंत्री ठाकरे यांचे कसारा घाटाच्या माथ्यावर असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथे काल दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले.  त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोलभाण येथे भेट दिली. गावातील मारुती मंदिरात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपले म्हणणे ऐकण्यासाठी मी येथे आलोय. प्रशासकीय यंत्रणेने पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करावी. महिनाभरात आढावा घेण्यासाठी मी येईन असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार रवींद्र फाटक, पांडुरंग बारोरा, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.