Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच  अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणार आहेत. तर, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी उद्धव ठाकरेंची बाजू मांडतील. ॲडव्होकेट रवीशंकर जंध्याल उपाध्यक्षांची बाजू मांडणार आहेत. राजकीय वर्तुळांचे लक्ष याकडे लागले आहे. 


सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका


दरम्यान. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमार्फत शिंदे गटाने  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे,भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे.  गटनेते, प्रतोद नियुक्त्या अवैध पद्धतीने केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाकडून उपाध्यक्षांकडून आलेला अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळल्याचे देखील म्हटले आहे.


एकनाथ शिंदेंची कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील हरीश साळवे मैदानात


शिवसेनेविरोधात बंड करून ठाकरे सरकारच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आता थेट सर्वोच्च न्यायालयाच धाव घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोर्टात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.  


शिवसेनेचे आव्हान, बंडखोरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार 


शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी थांबले आहेत. दररोज वेगवेगळ्या क्लिप, बातम्या समोर येत आहेत. त्याशिवाय, शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आमच्याकडून आमदारांवरील कारवाईबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. बंडखोरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही सूतोवाच त्यांनी केले. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी कोर्टात धाव घेण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना 27 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.