नवी दिल्ली : शहरी नक्षलवादाच्या आरोपावरुन महाराष्ट्र पोलिसांची कारवाई सुरुच आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयाने मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळताच महाराष्ट्र पोलीस भारद्वाज यांच्या अटकेसाठी हरियाणातील (दिल्लीजवळील) त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी हरियाणा पोलिसांसोबत सर्व औपचारिकता रात्रीच पूर्ण केल्या. महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सकाळी त्यांना अटक केली जाईल. महाराष्ट्र पोलीस रात्री साडे बारा वाजता सुधा भारद्वाज यांच्या निवासस्थानी पोहोचले.

सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोंसालविस यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी पुणे न्यायालायत अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला. फरेरा आणि गोंसालविस यांना मुंबईतून एकाच दिवशी अटक करण्यात आली होती. पुन्हा एकदा मुंबईतून फरेरा आणि गोंसालविस यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

तीनही मानवाधिकार कार्यकर्ते 29 ऑगस्टला अटक केल्यानंतर नजरकैदेत होते. सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर रोजी स्पष्ट केलं होतं, की हे सर्व जण आणखी चार आठवडे नजरकैदेत राहतील आणि त्यांना खालच्या न्यायालयात जामीन अर्ज करण्याची मुभा असेल. ही मुदत शुक्रवारी संपताच पोलीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसून आले.

कथित नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.