ST Mahamandal Bus News: एसटी महामंडळाला( ST Mahamandal) कोरोना काळात मागील दोन वर्ष अतिशय खडतर गेले आहेत. कोविड काळामध्ये एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेला एसटीचा संप. याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. या सर्व गदारोळात एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम झाला होता. एकंदरीत सर्वच ठप्प झालं होतं. आता काही दिवसांपासून एसटी सेवा सुरुळीतपणे सुरु झाली आहे. महामंडळात नवीन एसटी बस दाखल होत नव्हत्या. जुन्या बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली होती. या सर्व बाबी लक्षात घेत एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात 700 नवीन बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.


लातूर आगारासाठी 100 बसचे नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती आहे आहे. पहिल्या टप्प्यात लातूर आगाराला 21 बस देण्यात आल्या आहेत. या बस आज मार्गस्थ करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. 


नवीन बसचे फीचर


टू बाय टू आसन व्यवस्था असणाऱ्या या बस आहेत. 
बारा मीटर लांबीच्या बस आहेत 
प्रशस्त आसन व्यवस्था 
लग्जरी बससारखी व्यवस्था 
लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना या बसमध्ये त्रास होणार नाही 
मात्र या बसच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही
भविष्यकाळात नवीन बसची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे ..


इंधन खर्च लक्षात घेता एस टी महामंडळ आता इलेक्ट्रिक बस आणण्याच्या विचारात आहे आणि त्या अनुषंगाने चाचणी होत आहे. सर्वप्रथम एसटी महामंडळला तोट्यातून बाहेर काढणे हा मुख्य हेतू आहे अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिली आहे


संप आणि संपानंतरच्या झालेल्या अनेक घटना घडामोडी पाहता एसटी महामंडळाचे सक्षमीकरण करणे,  गतिमानता वाढवणे, अपघाताचे प्रमाण कमी करणे,प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्या वाढवणे, प्रवाशांना आरामदायक सुरक्षित लांब पल्याचा प्रवास करण्यासाठी नवीन पद्धतीच्या बस उपलब्ध करून देणे असे अनेक उद्दिष्ट समोर ठेवून एसटी महामंडळ नवीन पद्धतीने काम करत आहे, असंही चन्ने म्हणाले. 21 बस मार्गस्थ होताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत उत्साह होता.