Nashik Lasalgaon Onion Market: आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून दहा दिवस बंद राहणार आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समिती उद्यापासून दिवाळीनिमित्त बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच परतीच्या पावसामुळे मेटाकुटीला आलेला शेतकऱ्याची कोंडी झाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असुन कांदा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अशातच दिवाळीचा सण सुरू झाल्याने लासलगावला सलग दहा दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. लासलगाव कांदा बाजार समितीतून देशभरात कांद्याची निर्यात केली जाते. मात्र आता बाजार समिती दहा दिवस बंद राहणार असल्याने देशभरात परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत. परिणामी कांद्याचे किरकोळ बाजारातील दर आणि घसरण्याची शक्यता आहे.


नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेतूनच देशभरात कांद्याचा पुरवठा केला जातो. यंदा अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. त्यातच परतीच्या पावसाने ही धुमाकूळ घातल्याने कांदा चाळीत ठेवलेला उन्हाळी कांदाही खराब झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यातच आता दिवाळीनिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दहा दिवस बंद राहणार आहे. 


दिवाळीमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यावरील कामगार गावी जात असल्याने बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील सर्व 14 बाजार समिती आणि उपबाजार समितींना जवळपास दहा दिवस सुट्टी राहणार आहे. लासलगाव बाजार समितीत उद्या म्हणजेच शनिवारपासून ते 30 ऑक्टोबर रविवार पर्यंत कांदा लिलाव बंद राहतील, तर उद्यापासून पाच दिवस धान्य भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीचे सचिवांनी सांगितले आहे.


शेतकऱ्यांची कोंडी
एकीकडे परतीच्या पावसाने सगळीकडे नासधूस केली असतांना आता दिवाळीनिमित्त बाजार समिती बंद राहणार असल्याने उरला सुरला कांदा देखील रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा पडून असून, हा कांदा जास्त दिवस टिकणारा नसतो. अशा परिस्थितीत दहा दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार आहे. तसेच जेव्हा बाजार समिती सुरु होईल तेव्हा कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.


ही बातमी पण वाचा- IND vs PAK, Weather Report : भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा उत्साह शिगेला, पण पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती?