Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी बहुचर्चित निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले. आता या पाण्याने संगमनेर तालुक्यात सिमोल्लंघन केलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी रात्रीच्या वेळी जलपूजन केले आहे. यावेळी उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यात पाणी आल्याने आनंदोत्सव साजरा केला. 


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प पूर्ण झाला असून पहिल्यांदा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तब्बल 53 वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. 31 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून डावा कालव्यात पाणी सोडून चाचणी सुरु करण्यात आली. या सोहळ्यास बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना मात्र निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. निळवंडे धरणापासून मजल दरमजल करत पाण्याने अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यात सिमोल्लंघन केलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि कन्या जयश्री (Jayashree Thorat) यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे पाण्याचे जलपूजन केले. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पाण्याचे अडथळे दूर करत पाणी आपल्या तालुक्यात आल्याचा आनंदोत्सव साजरा केला आहे. 


संगमनेर (Sangamner) तालुक्यात पाणी पोहचताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रात्री 11 वाजता पाण्याचे जलपूजन करण्यात आले. दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करुन पाण्याचे जलपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. कॅनॉलमध्ये अनेक मोठे दगड असल्याने अडथळे येत होते. मात्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत कॅनॉलमधील अडथळा दूर करत पाण्याला मोकळी वाट करुन दिली. 


आता उजव्या कालव्याला पाणी सोडाेवे


निळवंडे धरणाच्या कामाच श्रेय माझे एकट्याचे नसून अनेकांनी कामासाठी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार यात सहा महिने गेले. उन्हाळा संपला आता पावसाळा सुरु होईल, त्यामुळे आम्ही पाणी सोडण्याचा आग्रह धरला. डावा कालवा सुरु झाला, आता उजव्या कालव्याला पाणी सोडाेवे, अशी मागणी यावेळी थोरात यांनी केली आहे. 


निळवंडेच्या कामात अनेकांचं योगदान


निळवंडेच्या कामात अनेकांच योगदान आहे. पाणी मिळणार असल्याने दुष्काळी भागात मोठ परिवर्तन घडून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. धरण आणि कालव्यांची कामे सुरु झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या, आंदोलने झाली. आम्हाला पाणी मिळाले याचा आनंद आहे. आम्ही श्रेयवाद कधीही केला नाही. आम्ही कामासाठी सातत्याने प्रयत्न केले हे नाकारता येणार नाही. श्रेय घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही, अशी सुद्धा काही माणसे आहेत, अशी टीका थोरात यांनी विखे पाटलांचे नाव न घेता केली आहे. 


हेही वाचा


Akole Nilwande Dam : आज आनंदाचा दिवस, तब्बल 53 वर्षांनी दुष्काळी भागाच भाग्य बदललं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले....