Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गाच्या (Samrudhhi Highway) दुसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन होत असून तत्पूर्वीच अनेक अपघात होत असल्याने हा मार्ग चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता समृद्धी मार्गावर अपघातांना आळा घालण्यासाठी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी 'समृद्धी'वर आता 'इम्पॅक्ट एटेन्युएटर' चा वापर करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक (Nhirdi To Nashik) या नव्याने सुरू होत असलेल्या मार्गावर या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. 


राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पहिल्यापासून चर्चेत आहे. आज  मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा (Samruddhi Mahamarg Mumbai Nagpur Expressway) आजपासून सुरू होणार असून शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र दुसरीकडे जेव्हापासून पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु झाली. मात्र दुसरीकडे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे समृद्धी महामार्ग आणखी चर्चेत आला. आता याच अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गावर 'इम्पॅक्ट एटेन्युएटर' या अंधानुक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. 


दरम्यान समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून खुल्या होत नाशिक ते शिर्डी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील 122 स्ट्रक्चरवर असे एकूण 244 इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसविण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर आता शिर्डीपासून नाशिक जिल्ह्यातील भरवीरपर्यंतचा ८० किलोमीटरचा दुसरा टप्पा येत्या शुक्रवारी सुरू होत असून त्यामध्ये पुलांचे कठडे वा ज्या ज्या ठिकाणी आर.सी.सी.चे बांधकाम असेल तेथे हे इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसविण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने जाणारी वाहने अशा कठोर बांधकामांवर आदळून होणाऱ्या अपघातांप्रसंगी या तंत्राचा उपयोग होणार आहे. 


अशी आहे 'इम्पॅक्ट एटेन्युएटर' यंत्रणा 


समृद्धी महामार्गावर अतिवेगाणे वाहन धावत असतात. अशावेळी टायर फुटून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. अशावेळी आदळणाऱ्या वाहनांची गतिज ऊर्जा शोषून घेण्याची ताकद इम्पॅक्ट एटेन्युएटर मध्ये असेल. महार्गावरील कठडे वा अन्य कठीण बांधकामांच्या प्रारंभी व शेवटाला हे एटेन्युएटर्स बसविण्यात येतात. त्यामुळे वेगातील वाहन थेट या कठीण बांधकामांना धडकण्याऐवजी अगोदर इम्पॅक्ट एटेन्युएटरला धडकते. या प्रक्रियेत त्यातील गतिज ऊर्जा शोषली जात असल्याने आतील व्यक्ती एकदम फेकली जाण्याची अथवा वाहनाच्या आतील भागावर आदळण्याच्या प्रक्रियेतील तीव्रता कमी होते. परिणामी, वाहनातील व्यक्तींना कमी प्रमाणात शारीरिक इजा होते. अनेकदा संभाव्य मृत्यूपासून देखील बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे संबंधित वाहनाचे होणारे नुकसानही तुलनेने कमी होते.


भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात 


मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटरच्या टप्यात शिर्डी, सिन्नर तालुक्यातील गोंदेगाव तसेच भरवीर अशा तीन इंटरचेंजचा समावेश आहे. त्याचा लाभ कोपरगाव, सिन्नर, नाशिक व इगतपुरी येथे जाणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्याने होणार आहे. त्याशिवाय या टप्प्यात सात मोठे पूल, 18 छोटे पूल, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, सहा वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा आहे.