Dada Bhuse : प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असून कोणीही आनंद साजरा करू शकत. संजय राऊत (Sanjay Raut) यांना मानणारा वर्ग आहे, ज्यांना आनंद आहे, ते साजरा करत आहेत. संजय राऊत जेलबाहेर आले आहेत, त्यामुळे अनेकजण आनंद साजरा करत आहेत. चुकीचं काही नाही, अशी प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली आहे. 


नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे यांनी अनेक दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आढावा बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी संजय राऊतांवर न बोलता इतर विषयावर बोलण्यास संमती दर्शवली. संजय राऊत 103 दिवसानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. यानंतर ठाकरे शिवसेनेनकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलला. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांना विचारले असता आनंदोत्सव साजरा करणे स्वाभाविक आहे, देशात सर्वाना आनंद साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आनंद साजरा करायला हवा, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली. 


यावेळी दादा भुसे म्हणाले, दिघे साहेब भाषणावर कमी जोर द्यायचे, काम अधिक करायचे, आताही शिंदे गटाच्या मंत्र्यांचे भाषण कमी अन काम जास्त अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे इतर राजकीय भाष्य करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करत आहोत. तसेच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया आणि ग्रामपंचायत निवडणुका असल्याने जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत आढावा बैठकीत झालेल्या चर्चेत त्यांनी माहिती दिली. आता शाळा महाविद्यालयांमध्येच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या आदेश दिले असल्याचे सांगितले. दोन वर्ष प्रकरणे प्रलंबित असून ती नियमाप्रमाणे निकाली काढावी असे आदेश दिले. विद्यार्थी प्रश्न प्राधान्याने घ्यावे, कायदा सुव्यवस्था बाबत सूचना करत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना बैठकीत दादा भुसे यांनी दिल्या आहेत. 


प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार 
ते पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत, हा ज्याचा त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. शिवाय संजय राऊत म्हणाले, कि 103 आमदार निवडून आणणार, तसेच प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पुरविली जात आहे. मात्र आचारसंहितेमुळे मदत वाटप करण्यात अडचणी येत आहेत. आचार संहिता संपताच शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे मदत वाटप होईल. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिपदा कोणाच्या पदरी अशी चर्चा होत्या. यात बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाबद्दलही अनेक चर्चा समोर आल्या. बच्चू कडू यांच्या मागणीनुसार दिव्यांगासाठी अनेक निर्णय घेतले असून त्यांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असा सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 


सुहास कांदे नाराज ?
दरम्यान आज झालेल्या बैठकीत नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे आज अनुपस्थित होते. त्यामुळे अद्यापही सुहास कांदे नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत देखील सुहास कांदे अनुपस्थित होते, त्यावेळी देखील पत्रकारांनी सुहास कांदे नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी भुसे यांनी आम्ही सोबत आहोत, ते कारणास्तव येऊ शकले नाही, असे उत्तर दिले होते. त्यानंतर आज पुन्हा सुहास कांदे बैठकीला गैरहजर असल्याने चर्चना उधाण आले होते.