Raksha Khadse BJP : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा निर्णय मी नाही सांगू शकत, माझी ओळख वेगळी आणि त्यांची वेगळी आहे. त्यामुळे त्याबाबत एकनाथ खडसे स्वतः तुमच्याशी बोलतील, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येऊन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी (NCP) भाजपसोबत आल्याने एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढतील का? या प्रश्नावर एकनाथ खडसे यांच्या सूनबाई तथा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 


कालपासून राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Political Crisis) सत्ता नाट्यांनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून नेमकं राज्याच्या राजकारणात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर कालपासूनच अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाल्या की, 'कुटुंब परिवार म्हणून आम्ही एकत्र असलो तरी आमचे पक्ष वेगळे आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत तर मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे ते सध्या काय करता आहेत, कोणासोबत आहेत. त्यांचा निर्णय काय? याबाबत मी काही सांगू शकत नाही, त्याबद्दल ते स्वतः बोलतील अस रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. 


आज गुरुपौर्णिमा (Gurupaurnima) असून या निमित्ताने भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी गुरूंचे गुरू म्हणून ओळखले जाणाऱ्या यावल येथील महर्षी व्यास मंदिरात येवून दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी रक्षा खडसे या महर्षी व्यास मुनी यांच्यासमोर नतमस्तक झाल्याचे  पाहायला मिळाले. यावेळी रक्षा खडसे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याठिकाणी पूजेनंतर रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आईवेळी त्या बोलत होत्या. खडसे म्हणाल्या की, आजची राज्याची जी परिस्थिती आहे, ती डोळ्यासमोर ठेवून देवाला साकडं घालणं गरजेचं आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस पडू दे, शेतकरी कष्टकरी या सर्वांना सुख-समृद्धी लाभावी, असे साकडे देवाला घातले, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. 


भविष्याचा विचार करून अजित पवारांचा निर्णय असेल...


अजित पवार यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतला असेल. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी भाजपसोबत युती केली आहे, अस रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. देशाला राजाला विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे, असं मत यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं. यावेळी महर्षी व्यासमुनी या मंदिरास 31 क्विंटल केळींची आरास करण्यात आली आहे. त्याला अनुसरून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विचारलं असता, केळी पिकाला योग्य तो भाव मिळावा, केळी उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याच रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.