मुंबई :  होळी सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ते 27 मार्च 2022 दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. 


 गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा 100  जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी अद्याप सुरू असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन जास्त दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेते परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. 


मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले आहे.


संबंधित बातम्या :


ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाकडून दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे महामंडळाला निर्देश


Holi 2022 : हानिकारक रंगांपासून त्वचा आणि केसांचं संरक्षण करायचंय? फॉलो करा 'या' 10 टिप्स...