Rohit Pawar: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यावर विरोधकांकडून टीकाही होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलतांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुधांशू त्रिवेदी यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली आहे. 'अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही', असा इशारा यावेळी रोहित पवारांनी दिला. 


यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीमध्ये बसतो. अरे दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवले होते. मात्र तिथे बसून तो म्हणतो की, महाराजांनी देखील माफी मागितली होती. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागण्याच्या लायीकाचा देखील आम्ही सोडणार नाही. तर भाजपच्या प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या या विधानावर राज्यातील एकही भाजपा नेता बोलला का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला. 


राज्यपालांवर टीका...


तर याचवेळी बोलतांना रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील निशाना साधला. 'मला आधी वाटत होते की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विचाराराची पातळी फारचं खालची आहे. पण आता निश्चित झाले आहे, त्यांना विचाराची पातळीच नाही. सहजपणे छत्रपती यांच्यावर बोलतात. थोर व्यक्तींच्या विरोधात जर तुम्ही बोलणार असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता राज्यात ठेवणार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करण्यात आले, त्यावेळी तुमच्या आमदारांनी विरोध केला का?, भाजपच्या नेत्यांनी विरोध केला का?' असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. 


माझा अभ्यास कच्चा...


मी राजकारणात नवीन आहे मात्र मी शेवटपर्यंत नवीन राहणार नाही. मलाही अनुभव येत आहे. मी राहुल गांधीना भेटलो, मी सावरकर बद्दल बोलणार नाही, माझा अभ्यास कच्चा आहे. मी त्यांची पुस्तके वाचली नाही असेही पवार म्हणाले. तर राहुल गांधी यांनी सावरकरांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप, शिंदे गट, मनसे आंदोलन करतात. मग इतर राष्ट्र पुरुषाबाबत गप्प का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. 


Aurangabad News: शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान! महाराष्ट्रात पहिली बंदची हाक औरंगाबादमध्ये