Aurangabad News: शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे. तर या निर्णयानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रात्री महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सोबतच कायदेशीर लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन सुद्धा केले. 


काय म्हणाले जलील...


जलील यांनी औरंगाबादच्या दारू सलाम येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची घेतलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये येऊन विकासाच्या मुद्यावर बोलणारे उद्धव ठाकरे सत्ता जात असल्याच कळताच औरंगाबादच नाव बदलून गेले. तर नामांतराचा श्रेय आपल्याला मिळावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता हा निर्णय घेतला असून, त्यांना संभाजीराजेंबद्दल कोणतेही प्रेम नसल्याचं जलील म्हणाले. तसेच या निर्णयाला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरू आणि न्यायालयीन लढाईसाठी वकिलांची फौज उभा करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. सोबतच लोकसभेत सुद्धा आपण हा मुद्दा मांडणार असल्याचं जलील म्हणाले. 


गेल्या आठवड्यात कौतुक आता टीका...


औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि एमआयएमचा एकमेकांना होणार विरोध काही नवीन नाही. मात्र असं असताना गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरून केलेल्या भाषणाचे जलील यांनी तोंडभरून कौतुक केले होते. उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्यांचा आदर अनेकपटीने वाढला असल्याच जलील म्हणाले होते. पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने जलील त्यांच्यावर चांगलेच संतापले आहे. 


काँग्रेसमध्ये राजीनामे सत्र 


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणताही विरोध करण्यात आला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, आणखी 200 पदाधिकारी राजीनामा देणार असल्याच समोर आले आहे.