रायगड : जो माणूस स्वत: च्या मतदारसंघातून निवडून येत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावर  काय टीका करणार अशा शेलक्या भाषेत राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. ते रायगडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी अमरावती हिंसाचार आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली होती. 


मंत्री उदय सामंत चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता म्हणाले की, "जो माणूस स्वत:च्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही, त्याला निवडून येण्यासाठी पुण्याला जावं लागतं, तो माणूस आपल्या साहेबांवर टीका करतोय." 


भाजप नेते चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून ते पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आले आहेत. 


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? 
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले की,  "एसटी कामगार आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे. इतका अमानवी अत्याचार महाराष्ट्राने या आधी कधीही पाहिला नाही. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, सध्याचे गृहमंत्री आताच आजारपणातून बरे झाले आहेत. त्यामुळे हे सरकार बाहेरुन चालवलं जातंय."


अमरावती, नांदेड मध्ये सुरु असलेल्या हिंसेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. या सरकारची आपल्याला कीव येते, राजकारणासाठी किती लाचार व्हायचं? मुस्लिमांच्या मतांसाठी आज दंगलखोरांवर काहीही बोललं जात नाही असं ते म्हणाले होते. 


संबंधित बातम्या :