NCP : बीडचे राष्ट्रवादीचे (Beed) माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी पक्षावर (NCP) नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू होती आणि याच पार्श्वभूमीवर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षावर नाराज नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. माझ्यावर चंदन चोर हा लागलेला कलंक असून बायको सुद्धा मला कधी कधी म्हणते की, आपल्याला चंदन चोर का म्हणतात तर राजकीय लोक माझ्यावर हे आरोप करत असतात. असे विधान बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. आणखी काय म्हणाले सोनावणे?


माझी छाती फाडली तर एका बाजूला अजित पवार दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे 


अनेक राजकारणी चंदन चोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सोनवणे यांनी मिश्किलपणे सांगितले की, माझी बायको पण कधी कधी मला म्हणते की आपल्याला लोक चंदन चोर का म्हणतात? मात्र राजकारणामध्ये आरोप करणारे लोक आरोप करतात. चंदनचोर हा माझ्यावर लागलेला कलंक आहे, मी गुत्तेदार नसून शेवटचा श्वासापर्यंत राष्ट्रवादीसाठी काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहून काम करणार असल्याचं सोनवणे म्हणाले. नगरपंचायत निवडणुकीत आपल्या मुलीचा पराभव झाला. हे जिव्हारी लागलं असलं तरी विजयाचा आणि पराजयाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी यासाठी पक्षाला जबाबदार धरणार नाही. धनंजय मुंडे, अजित पवार हे माझे नेते आहेत त्यामुळे मी कोणावरही नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे.


अखेर बजरंग सोनावणेंनी मौन सोडलं


बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काही दिवसापूर्वी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली होती आणि तेव्हापासूनच माजी अध्यक्ष बजरंग सोनवणे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज बजरंग सोनवणे यांनी बीड शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपले मौन सोडले आहे. केज नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे शल्य आहे. पण माझी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे. कार्यकर्त्यांना समजावून सांगू कार्यकर्त्यांचा निश्चितपणे गैरसमज दूर करू, असे सुद्धा यावेळी बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.


..त्या काळात मी नॉटरिचेबल होतो


यावेळी बजरंग सोनवणे यांनी पक्षांचे आभार मानले कारण जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा एक वर्ष यांच्याकडे हे पद राहिले. मात्र ज्यावेळी नवीन जिल्हाध्यक्षांचा निर्णय झाला त्यावेळी आपल्याला ही नियुक्ती कशी झाली हे माहीत नाही हे सांगताना त्या काळात मी नॉटरिचेबल होतो असेही बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचलो नाही, काम करित राहिलो. चांगल्या कामाची पावती मिळत असते. १९९२ पासून बरेच विजय, पराजय पाहिलेत. ३१ वर्ष राजकारणात टिकूनय.पण नगरपंचायत निवडणुकीतील पराजयाचं शल्य आहे. यातून अनेक लोकं उघडे पडलेत. विधानपरिषदेला राष्ट्रवादीने आयात उमेदवार का आणला? भाजपला जागा द्यायची होती का? मागच्या जिल्हापरिषद निवडणुकीत बहुमत असतानाही सत्ता आली नव्हती, मी न्यायालयीन लढाई लढलो आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आणली. प्रत्येकवेळी मी झटून काम केले, पण पवारांच्या शब्दावर माघार घेत गेलो. मी पद कायम गौन मानले. पण तरीही काही लोक माझं पद काढण्यासाठी जातात याच शल्य आहे. पक्ष अडचणीत असताना, मोठमोठे लोक सोडतं असताना, मी संघटनेत काम केले, आणि आष्टीची जागा निवडून आणली. माझ्याकडे नेत्यांच्या मागे पुढे करण्याची सवय नाही. केवळ पवारांच्या विचारांवर काम केलं. असेही यावेळी सोनवणे म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha