Nitin Raut : राज्यासमोर कोळशाच्या तुटवड्याचं मोठं आव्हान आहे. राज्यात सध्या 17 दिवसांचीच वीजनिर्मिती उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणखी काय म्हणाले उर्जामंत्री?


कोळश्याच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू


राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असून केवळ 17 दिवसांची वीजनिर्मिती उपलब्ध आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यात 3 हजार मेगावॅट विजेची तूट आहे. राज्यात वीजेची मागणी 30 हजार मेगावॅट पर्यंत वाढण्याचा अंदाज उर्जामंत्र्यांनी वर्तविला आहे. कोळश्याच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून महागडी वीज विकत घेण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जाची फेररचना करून वीजेसाठी पैसा उभारण्याचे प्रयत्न करणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राज्यात लोडशेडिंग होऊ नये यासाठी काळजी घेत असल्याचंही नितीन राऊत यावेळी म्हणाले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान काळात लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री म्हणाले...
पत्रकारांशी संवाद साधताना नितीन राऊत म्हणाले, वीज चोऱ्या अधिक असलेल्या भागात भारनियमन करण्यात येणार आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी वॉररूमही तयार करण्यात येणार आहे, दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान या काळात भारनियमन टाळण्याचे प्रयत्न करणार आहे. या काळात ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा असून दररोज सकाळी 6 ते सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत वीज वाचवण्याचे आवाहन करतो." असे उर्जामंत्री म्हणाले


महावितरणकडून आजपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर 


देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्याने हे लोडशेडिंग केले जात आहे. "वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे- त्यामुळेच आम्ही लोडशेडिंग करत आहोत. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे," असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.  महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर केले आहे. मात्र या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला याचा फटका बसणार नाही. असे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीजबिल वसुली देखील उत्तम आहे असे महावितरणच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण भागात आहेत.


विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा फटका बसणार


विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. "काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो तरीही, आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहोत," असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.