Maharashtra Breaking News LIVE Updates : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 28 Nov 2021 11:08 PM
चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या प्रकरणाचे रुग्ण वाढू लागल्यानं जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आलेत. तसेच त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का? याचीही तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

 



भिवंडीतील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभाच्या दरम्यान आतिषबाजीमुळे आग लागली असून त्यामध्ये अनेक दुचाकी व वाहन जळून खाक झाल्या आहेत. आगीवर  नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 852 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3926 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

चर्चेला मला बोलवा, एसटी विलिनीकरण कसं करायचं ते मी सांगतो; प्रवीण दरेकरांचे आव्हान

एसटी संपाबाबत सरकारला मी आव्हान करतो, चर्चेला मला बोलवा विलनीकरण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. 

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची उद्या तातडीने बैठक; ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बैठक होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची उद्या तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बैठक होत असल्याचे म्हटले जात आहे. 

राज्य मंत्रिमंडळाची उद्या तातडीची बैठक, ओमिक्रॉन व्हेरियंटवर चर्चा होण्याची शक्यता

राज्यातील ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून उद्या राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 

परळी वैजनाथनंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर देवस्थानला धमकी
चार दिवसांपूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला 50 लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. असेच पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे.. योगेश्वरी देवस्थान कमिटी च्या नावाने आलेल्या पत्रामध्ये पन्नास लाख रुपये द्या. नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे.

 

 
ओमिक्रान या नव्या व्हेरीयंटबद्दल केंद्र आरोग्य सचिवांचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित सूचना 

ओमिक्रान या नव्या व्हेरीयंटबद्दल केंद्र आरोग्य सचिवांचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित सूचना 


सर्व आंतराष्ट्रीय फ्लाईट्सवर नजर ठेवत, नियमावली आणि प्रोटोकाॅल पाळण्याच्या सूचना, सर्व पाॅझिटिव्ह रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना 


आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना


हाॅटस्पाॅटवर नजर ठेवत सतत माॅनिटरिंग करण्याचे निर्देश 


आरोग्य यंत्रणा सक्षम आहे की नाही ह्या तपासण्याच्या सूचना तसेच नसल्यास सक्षम ठेवण्याचे निर्देश 


नमुने INSACOG लॅब नेटवर्कला पाठवून जीनोम सिक्वेन्सिंग

Nagpur Crime : उपराजधानी हादरली! 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या

Nagpur Crime News : नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलंय. नागपूरात 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या टीबी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या. धक्कादायक म्हणजे मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि  तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आझाद मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेत मजूर दाखल होत आहेत. मोदी सरकारनं मागे घेतलेले शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असं येथील उपस्थित शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोबतच मालाला एमएसपी देखील देण्याची मागणी पुढे येत आहे. सुमारे १० ते १५ हजार जणांची संख्या आज उपस्थित असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

 भिमानगर येथे ट्रक आणि मळी वाहक टँकरचा भीषण अपघात :  5 ठार तर 6 जखमी

सोलापूर पुणे महामार्गावर  भिमानगर येथे ट्रक आणि टँकरची धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघात 5 जणांचा मृत्यू झाला . अपघात झाला.  सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टँकरच्या चालकांचा ताबा सुटला. त्यामुळे टँकर दुभाजकावरुन समोर उभारलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यामध्ये चालकांचा आणि ट्रकमध्ये बसलेल्या इतर व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला. तर 6 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संसद अधिवेशनाच्या आधी आज बैठकांचे सत्र, अकरा वाजता संसदीय कामकाज मंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक तर संध्याकाळी साडेपाच वाजता उपराष्ट्रपतींची बैठक

संसद अधिवेशनाच्या आधी आज बैठकांचे सत्र, 


अकरा वाजता संसदीय कामकाज मंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक तर संध्याकाळी साडेपाच वाजता उपराष्ट्रपतींची बैठक


सर्वपक्षीय बैठकीसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार तर शिवसेनेकडून विनायक राऊत हजर राहणार


शिवसेना कृषि विधेयकाच्या सोबत लखीमपुर च्या घटनेवर ही आक्रमक राहणार, केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा


याशिवाय पेट्रोल-डिझेल सीएनजी महागाईचा प्रश्न उपस्थित करणार


महाराष्ट्राच्या दृष्टीने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मदतीच्या निकषांमध्ये वाढ करण्याची मागणी लावून धरणार


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीतही उपस्थित केला होता, त्याबाबतही केंद्राने पावले उचलावीत यासाठी शिवसेना आग्रही


महाराष्ट्राला केंद्राकडून येणारी जीएसटी थकबाकी 55 हजार कोटी रुपये आहे.. ती तातडीने मिळावी

ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय

BMC on coronavirus new variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. 


दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-19 चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Omicron Variant : ओमिक्रॉनचं संकट! राज्य सरकार सतर्क, उचलली 'ही' पावलं

MVA govt on Coronavirus new Omicron Variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Government : महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं आज आपली दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अनेक खलबतं, राजकीय नाट्यानंतर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ठाकरे सरकारनं (Thackeray Government) राज्याची धुरा सांभाळली होती. 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2019 निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली. पण निवडणूक निकालांनंतर नाराजीनाट्य सुरु झालं. निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि सत्तेची सर्व गणितं बदलली. तिन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) राज्यात उदय झाला आणि निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका स्विकारावी लागली. आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेची धुरा सांभाळली. 


कोरोनाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पूरस्थिती यांसारखी अनेक संकटं राज्यावर चाल करुन आली आणि त्यावेळी ठाकरे सरकारची कसोटी पणाला लागली. विरोधकांचे टीकेचे बाण झेलत तीन पक्षांचं सरकार असलेल्या ठाकरे सरकारनं वेळोवेळी सत्वपरिक्षा पार केली. अनेकदा टीकेची झोडही उठली पण त्यातूनही मार्ग काढत आजपर्यंतचा प्रवास ठाकरे सरकारनं पार पाडला आहे. 


मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... उद्धव ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ


आजच्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालं होतं. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं होतं. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतली होती. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.


ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या भागांत उत्सव साजरा करणार आहेत. अशातच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेलं भाजप राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल करणार आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सरकार आपल्या कामांचा पाढा वाचणार आहे, तर विरोधी पक्ष सरकार कसं अपयशी ठरलं हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. सरकारनं दोन वर्षांत केलेली काम जनतेसमोर मांडण्यासाठी महाविकास आघाडीत समाविष्ठ असलेल्या तिनही पक्षांचे कार्यकर्त्यांकडून लहान-मोठ्या संभांचंही आयोजन करण्यात आलं आहे. 


288 सदस्य असलेल्या विधानसभा निवडणुकांमधून शिवसेनेचे 56 आमदार, राष्ट्रवादीचे 54 आमदार तर काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 105 जागांवर विजय मिळवला होता. पण 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 26.1 टक्के मत मिळाली होती. तर शिवसेनेच्या खात्यात 16.6 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत एनसीपीच्या खात्यात 16.9 टक्के मत मिळाली होती. तर काँग्रेसला 16.1 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत इतर दलांना 14.3 टक्के मतं मिळाली होती. 


दरम्यान, महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं, त्यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी मत मांडलं होतं की, हे आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. तसेच या तिनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी फारसं जुळणार नाही, असंही मत त्यावेळी व्यक्त केलं जात होतं. पण सत्तेची दोन वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत ठाकरे सरकारनं अनेक राजकीय विश्लेषकांची मतं खोटी ठरवली आहेत. अनेकदा ठाकरे सरकारमधील नाराजी, मतभेद चव्हाट्यावरही आले. एवढंच नाही तर विरोधकांनीही वेळोवेळी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तो यशस्वी झाल्याचंही पाहायला मिळालं. पण तरिही वेळोवेळी आपसी मतभेद दूर करत, ठाकरे सरकारनं आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.