सरकारी नोकरी:


मुंबई: फडणवीस सरकार दोन वर्षात तब्बल 72 हजार सरकारी पदं भरणार आहे. त्यापैकी 36 हजार यावर्षी तर 36 हजार पदं पुढील वर्षी भरण्यात येतील.

मात्र या भरतीप्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे.

ही पदं भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर भरली जातील. त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.

जसे सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आहे, ती आता 5 वर्षे असेल. तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची 36 हजार पदं पहिली पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. त्यानंतर ती नियमित केली जातील.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे.

राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत आणि त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

जम्बो भरती

राज्य सरकार जम्बो भरती करणार आहे. राज्याच्या विविध विभागात थोडीथोडकी नव्हे तर 72 हजार पदं भरली जाणार आहेत. त्यापैकी 36 हजार यंदा, तर 36 हजार पुढच्या वर्षी ही पदं भरली जातील.

विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आता ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर बातमी - राज्य सरकारची जम्बो भरती, 72 हजार पदं भरणार, नोकरीची सुवर्ण संधी!  

कोणत्या विभागात किती पदे भरणार?

ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे

आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे

गृह विभाग- 7 हजार 111 पदे

कृषी विभाग- 2 हजार 572 पदे

पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे

सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे

जलसंपदा विभाग- 827 पदे

जलसंधारण विभाग- 423 पदे

मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90

नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे