Palghar: पालघर येथे जवळपास तीन आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. गेल्या 21 दिवसांपासून संबंधित तरूण बेपत्ता होता, अशी माहिती समोर आलीय. अखेर आज सकाळी एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मुलाची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


चेतन मदन खंदारे असे मृत आढळलेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे.  चेतना इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून तो पालघरमधील सेट जीन्स कॉलेजमधील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. 3 मार्च रोजी चेतन अचानक बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस चेतनचा शोध घेत होते मित्र परिवार, नातेवाईक, ओळखीचे इतर याच्याकडे चौकशी करूनही चेतनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तीन आठवड्यानंतर पालघर बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिज जवळ त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवलाय. 


चेतनसोबत नेमकं काय घडले ? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्यानं आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला की हा एक अपघात आहे. परंतु, चेतनच्या नातेवाईकांनी मात्र त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्युचं नेमकं कारण काय? हे स्पष्ट होईल. त्यानुसार चौकशीची दिशा ठरेल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha