Maharashtra Coronavirus Lockdown LIVE Updates : देशात गेल्या 24 तासांत 1.52 लाख नवे रुग्ण, 3128 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Maharashtra Covid 19 Cases Lockdown LIVE Updates : राज्यातील कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊन संबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 May 2021 02:26 PM
देशात गेल्या 24 तासांत 1.52 लाख नवे रुग्ण, 3128 कोरोनाबाधितांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 152734 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3128 नागरिकांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले. नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेच मागील दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त होता. तब्बल 238000 रुग्ण कोरोनातून बरे झाले. याआधी शनिवारी देशात एकूण 165553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही एकंदर आकडेवारी पाहता काही अंशी नव्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं कळत आहे. 

जाणून घ्या; देशातील आजची कोरोना स्थिती

देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोना रुग्ण - 2 कोटी 80 लाख 47 हजार 534

  • कोरोना मुक्त झालेले रुग्ण - 2 कोटी 56 लाख 342

  • एकूण सक्रिय रुग्ण - 20 लाख 26 हजार 

  • एकूण मृत्यू - 3 लाख 29 हजार 100

Maharashtra Corona :  एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात

Maharashtra Corona : देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरुच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणार आहे. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून मग ती पहिली कोरोनाची लाट असो वा दुसरी. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. अचानक आलेल्या कोरोना संकटामध्ये झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, वाढता मृतांचा आकडा, ऑक्सिजनसह बेडची कमतरता यासारख्या आरोग्य यंत्रणांतील त्रुटींचाही सामना महाराष्ट्रानं केला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या एकूण आकड्यापैकी सर्वाधिक आकडाही महाराष्ट्राचाच आहे. 

कोरोना नियमांचे पालन करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात नवीन ऑक्सिजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी 3 महिने ते 18 महिन्यांचा कालावधी लागेल, तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावं लागत आहे. राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केलं तसंच सहकार्य पुढे करावं, कोराना प्रतिबंधक नियमांचे पालन करावं, असं आवाहनमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.

गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी (30) मे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना, लॉकडाऊन, च्रकीवादळ यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी करुन कोरोनामुक्त गाव करणाऱ्या संरपंचांचे कौतुक देखील केलं.


आपण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार', अशी वेगवेगळी अभियानं यशस्वीरित्या राबवली. आता शहर आणि गावांनी ठरवलं तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झालं तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचं आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुया," असं आवाहन त्यांनी केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवारऋतुराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचांच्या कामाचा गौरव केला. 

राज्यातील जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर काय? 

राज्यातील जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर काय? 



  • मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 11.27 टक्क्यांवर आहे, तर सध्या मुंबईत 27,322 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. 

  • पुण्यात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीसी घट झाली असली तरी पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.93 टक्के इतका आहे. 

  • नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर 8.11 टक्के आहे. 

  • औरंगाबाद जिल्ह्यात 219 रुग्ण असून त्यापैकी शहरात 62 आणि ग्रामीणमध्ये 167 रुग्ण आहेत. तसेच औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी दर 3.70 इतका आहे. 

  • बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.43 इतका आहे.

  • सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 8.90 टक्के इतका आहे. 

  • बुलढाणा जिल्ह्याच्या सरासरी पॉझिटिव्हिटी दर 14.76 टक्के इतका आहे.

  • पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 16.78 इतका आहे. तर पालघर ग्रामीण जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 14.75 इतका आहे (वसई विरार मनपा वगळून)

  • नांदेड जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत असून 30 मे पर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर 7.06 टक्के इतका आहे.

  • सांगली जिल्हाचा पॉझिटिव्हीटी रेट 17 टक्के आहे. 

  • परभणी जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर हा 8.5% आहे.

  • हिंगोली सरासरी 7% एवढा पॉझिटिव्हिटी दर आहे.

  • अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असून 30 मे पर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर 17.32 % इतका आहे.

  • रायगड जिल्ह्यात आज एकूण 6903 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एकूण पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांवर आहे. 

  • वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अंदाजे 6 टक्के इतका आहे. 

  • रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 17.69 टक्के इतका आहे.

  • नंदुरबार जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर 4 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

राज्यात 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. शहरातील कोरोना आटोक्यात आला असला तरी ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

ईशान्येकडील राज्यांत लॉकडाऊनमध्ये वाढ

ईशान्येकडील अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. नागालँडमध्ये 11 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर मणिपूर सरकारने 11 जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरमची राजधानी आईजोल कॉर्पोरेट क्षेत्रातही 6 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात मेघालय सरकारने संपूर्ण लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविला आहे.

लोकसंख्येच्या आधारे विचार करता भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पुन्हा सुरु झाल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बर्‍याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगतो. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर, तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 8 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 

भारतातील आजची कोरोना स्थिती; 3 लाख 25 हजार 972 रुग्णांचा मृत्यू

  • एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 78 लाख 94 हजार 800

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 54 लाख 54 हजार 320

  • एकूण सक्रिय रुग्ण : 21 लाख 14 हजार 508

  • एकूण मृत्यू : 3 लाख 25 हजार 972

देशात गेल्या 24 तासांत 1.65 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 76 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एका दिवसापूर्वी शुक्रवारी 173,790 तर गुरुवारी 186,364 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, मात्र मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

16 मे रोजी सात दिवसांच्या सरासरीने दैनंदिन मृतांचा आकडा 4040 पर्यंत पोहोचला होता. सध्या ही संख्या 3324 इतकी आहे. देशात कोरोना महामारीमुळे होणाऱ्या दैनंदिन मृतांची संख्या आतापर्यंत 3 हजारांहून खाली आलेली नाही. शनिवारी देशात या व्हायरसमुळे 3080 मृत्यू झाले आहेत. जे गेल्या काही दिवसांतील आकड्याच्या तुलनेत जवळपास सारखीच होती. 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या पूर्वीची वाढ दर्शवते. तीन आठवड्यांत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन सरासरी आकडेवारीत अर्ध्याहून अधिक घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ही संख्या तीन वर्षांपूर्वी ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी 17 एप्रिल रोजी सात दिवसांची सरासरी आकडेवारी  2,03,949 इतकी होती. 

देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत 50 टक्क्यांची घट

Coronavirus in India : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. परंतु, काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ तीन आठवड्यांत 8 मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येच्या सात दिवसांची सरासरी वाढलेल्या संक्रमणाच्या विक्रमी संख्येपेक्षा अर्ध्यावर गेली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येच्या आकडेवारीची सरासरी 2 लाखांपेक्षा कमी झाली आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 1,95,183 इतका होता. जो दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक 3,91,263 रुग्णसंख्येच्या जवळपास 50 टक्के एवढा होता. देशातील कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेच्या सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत अर्ध्या वेळेतच 50 टक्के घट झाली आहे.

सातारा जिल्ह्यात 1990 कोरोनाबाधित तर 34 मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल 1990 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. काल उपचार घेऊन 2398 रुग्णाना घरी सोडण्यात आलं आहे. आज अखेर जिल्ह्यात 164,724 बाधित सापडले आहेत तर 137,441 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे. 

राज्यात शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये हजारच्या घरात नवीन कोरोना रुग्णांची नोंद, साताऱ्यात सर्वाधिक 2177 रुग्ण

राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.

सांगलीत लॉकडाऊन काळात दोन महिन्यात दोन कोटीचा दंड वसूल, 33 हजार दुचाकी तर 5 हजार चारचाकी जप्त

सांगली जिल्ह्यात पोलिसांनी दोन महिन्यात दोन कोटीचा दंड वसूल केला आहे. लॉकडाऊन काळात अनावश्यक कारणांमुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये 33हजार दुचाकी तर 5 हजार चार चाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती. असं असताना देखील नियमांचं उल्लंघन करत बाहेर करणाऱ्या लोकांच्या वर दंडात्मक कारवाई सुरु केली. 8 एप्रिल ते 28 मे 2021 या दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल एक कोटी 90 लाख 56 हजार याचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर विनामास्क फिरणाऱ्या 99 हजार 711 जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय 33 हजार 283 दुचाकी आणि पाच हजार 415 चारचाकी वाहने या काळामध्ये जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या नावे 5 लाख रुपये ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार

कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळणार आहे. तर एक पालक गमावलेल्या बालकांना 'बाल संगोपन' योजनेत समाविष्ट करत दरमहा 2500 रुपये मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सकारात्मक असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शुक्रवारी (28 मे) चर्चा झाली. राज्यात कोरोना काळात एकूण 2915 बालकं अनाथ झाली आहेत. त्यात एक पालक गमावलेली 2801 बालक आहेत तर दोन्ही पालक गमावलेले 114 बालक आहेत. या बालकांसाठी राज्य सरकार मदत करण्याचा निर्णय घेणार आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा गुरुवारी (27 मे) मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जूननंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


महाराष्ट्रात शनिवारी 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 


राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.


राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.


पुणे जिल्ह्यात काही बंधनं काढून टाकली जाणार
पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले. परंतु, डेथ रेशो आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेला नाही. संपुर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगी शास्त्रीय पद्धतीने वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी हाय रिस्क एरिया आहे तिथेच ट्रेसिंग व्हायला हवे. उगीच कुठेही ट्रेसिंग करुन पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, असं दाखवता कामा नये.


संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यात येणार 
होम क्वारंटाईन कमी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवायला हवे, अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. बऱ्याचवेळा होम क्वारंटाईन असलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अनेकांनी ही मागणी केली होती. प्रत्येक हॉस्पिटल्सची बिलं तपासण्यासाठी डेडिकेटेड ऑडिटर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारली जात आहेत. ऑडिटरने हे रोखावे ही अपेक्षा आहे, असं टोपे म्हणाले. 


निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा
अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, अनेक मोठी हॉस्पिटल्स सरकारी योजना त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागू करत नाहीत. त्या कराव्यात यासाठी चॅरिटी कमिशनरांना सूचित करण्यात आलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःच्या स्टाफला स्वतःच्या खर्चाने लस द्यावी अशा सूचना औद्योगिक क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स लसीसाठी जास्तीची रक्कम वसूल करत आहेत. प्रशासनाला त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल. परंतु, निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.